Sunday 25 May 2014

तत्त्वभान २१ भारतातील तत्त्वज्ञानशाखा २२ मे २०१४


आचार्य ब्रजेन्द्रनाथ सील १८६४-१९३८  


भारतातील तत्त्वज्ञानशाखा 

श्रीनिवास हेमाडे 
प्रत्यक्ष 'जीवनात तत्त्वांची लढाई' इत्यादी भाषेत अव्यावसायिक रितीच्या स्वरुपात तत्त्वज्ञान आवश्यक असतेच पण व्यावसायिक, पेशा या स्वरुपात तत्त्वज्ञानाचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी ते गरजेचे असते. तेथे पूर्णवेळ संशोधन केले जाते, जे त्या राष्ट्राचे विचारधन बनते. बुद्धिमता हे राष्ट्राचे भांडवल असते. 
      भारतीय प्रबोधनकालाचा इतिहास पाहता पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा भारतातील प्रवेश किमान दोन रीतीनी झाला, असे ढोबळमानाने म्हणावे लागते. पहिली रित प्रबोधनाच्या रुपात होती तर दुसरी रित शैक्षणिक रुपात (अॅकेडेमिक) आली. प्रबोधनाचा अनिवार्य, अटळ कार्यक्रम म्हणून प्रत्यक्ष जीवनात; राजकीय व सामाजिक सुधारणांच्या विविध प्रकारच्या चळवळीत ब्रिटीश तत्त्वज्ञान प्रवेश करते झाले. म्हणजे तत्कालीन इंग्लंडमध्ये ज्या सुधारणा ज्या तात्त्विक विचारसरणीच्या आधारे घडत होत्या, त्या सुधारणा व विचारसरणी भारतात पोहोचल्या. दुसरी रित अॅकेडेमिक स्वरुपाची होती. ती विद्यापीठात तत्त्वज्ञान या नावाने अभ्यासक्रमात समाविष्ट झाली. पहिली रित अव्यावसायिक –लोकचळवळ या स्वरुपाची होती तर दुसरी व्यावसायिक, पेशा या स्वरुपाची होती. 
          भारतातील 'ब्रिटीश राज' च्या आधी मुसलमानी व मोगल सत्तेच्या काळात ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्रवेश झाला होता. या काळात भारतात मद्रसा आणि मक्तबा स्थापन झाल्या. अरबी व फार्सी भाषा-साहित्याबरोबरच धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, ज्योतिषशास्त्र,गणित कायदा इ. विषयही तेथे शिकविले जात. यात धर्मशास्त्र वगळता इतर विषय ग्रीक विद्येतून घेतले गेलेले होते. त्यात प्रामुख्याने अॅरिस्टॉटलचे तर्कशास्त्र आणि त्याचे तत्त्वज्ञान यांचा समावेश होता. दिल्ली आणि लखनौ ही मुख्य केंद्रे होती. शहा वलीउल्लाह आणि मुल्ला निझामुद्दीन सह्लावी या दोन विद्वान, बहुभाषिक पंडितांनी 'दर्स-इ-निझामी' हा खास अॅरिस्टॉटलचे तर्कशास्त्र आणि त्याचे तत्त्वज्ञान शिकविण्यासाठी बनवलेला अभ्यासक्रम होता. शहाबुद्दीन घोरी, मुहम्मद तुघलक, फिरोझशाह तुघलक यांनी तसेच मोगल घराण्यांतील हुमायूनअकबर यांनी विद्यार्जनास खूपच उत्तेजन दिले. अकबराच्या काळात हिंदु-मुस्लिम पंडित एकत्र अध्ययन करू लागले. त्याने पतंजली, भास्कराचार्य दुसरे, चरक, इब्न सीना आणि अॅरिस्टॉटलचे तत्त्वज्ञान यावर भर दिला. भारतीय मोगल काळात ब्रिटन-युरोपात फार काही घडले नव्हते. पण भारतात ग्रीकविद्या प्रवेश करती झाली, पण तिने मूळ धरले नाही. कारण औरंगजेबनंतरचा इतिहास वेगळा घडला. मोगल सत्तेनंतरचे जे उच्च शिक्षण ब्रिटिशांनी सुरु केले, त्यामार्फत मात्र पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञान भारतात जोमदारपणे आले. 
         'प्रबोधनकालीन भारत' या शब्द्समुहाचा अर्थ आजचा भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश. ब्रिटिशांनी विद्यापीठे स्थापन करण्यामागे दोन करणे होती. पहिले, भारताय अभिजनांनी यूरोपीय शिक्षण पद्धतीसारखे उच्च शिक्षण मिळावे, अशी सतत केलेली मागणी आणि दुसरे ब्रिटिशांनाही राज्यकारभारात व व्यापारात कारकुनी व पर्यवेक्षणाच्या कामासाठी यूरोपीय शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. त्यानुसार १८५७ मध्ये कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे, त्यानंतर पंजाब (१८८२), अलाहाबाद (१८८७), ढाका (१९२१), नागपूर (१९२३ ) ही विद्यापाठे स्थापन केली. अलीगढ येथे महम्मदन् अंग्लो –ओरीएंट कॉलेज (१८७५) – आजचे अलीगढ विद्यापीठ, कराचीत सिंध मद्रसा युनिव्हर्सिटी (१८८५) पेशावरमध्ये इस्लामिया कॉलेज युनिव्हर्सिटी (१०१३) स्थापन झाली. पण ती ब्रिटीशांच्या पुढाकाराने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली खासगी विद्यापीठे होती. राजा राममोहन रॉय यांच्या नेतृत्वाखाली हिंदू कॉलेज (१८१७) स्थापन झाले. हे ही खासगी होते. 
           इंग्रजीविद्येचा भाग म्हणून जेरेमी बेंथम, जेम्स मिल, त्याचा मुलगा जे. एस. मिल यांनी सांगितलेला उपयुक्ततावाद आणि हर्बर्ट स्पेन्सरची उत्क्रांतिवादी नीती यांच्या रुपात पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा भारतात प्रवेश झाला. या उपयुक्ततावाद व उदारमतवादी विचारसरणीच्या प्रभावामुळेच 'भारतीय प्रबोधनपर्व' सुरु झाले. राजा राममोहन रॉय हे प्रबोधनाचे अध्वर्यू होते. राममोहन यांना 'आधुनिक भारताचे जनक' म्हणण्याचे कारण तेच आहे. भारतीय ब्रिटीश प्रशासनात माउंट एलफिस्टनने फ्रान्सिस बेकन, डेविड ह्यूम,जॉर्ज बर्कले,जोसेफ बट्लर, तसेच जेरेमी बेंथम यांचे बरेच वाचन केले होते. ते त्याने प्रशासन करताना उपयोगात आणले. भारतात जे तत्त्वज्ञान अभ्यासक्रमात समाविष्ट झाले ते मुख्यतः विविध नैतिक सिद्धांत आणि चिद्वाद या प्रकारचे होते. 
      भारतातील तत्त्वज्ञानाचा पदवीचा अभ्यासक्रम प्रथम कलकत्ता विद्यापीठात (१९०७), नंतर मुंबई विद्यापीठ (१९१०अंदाजे) आणि मद्रास विद्यापीठात (१९२७) साली सुरु झाला. कलकत्ता विद्यापीठातील पहिले भारतीय प्राध्यापक म्हणजे आचार्य ब्रजेन्द्रनाथ सील (१८६४- १९३८). सील हे बंगाली मानवतावादी तत्त्ववेत्ते म्हणून ओळखले जातात. ते ब्राह्मो समाजाचे समर्थक विचारवंत आणि स्वामी विवेकानंद यांचे वर्गबंधू होते. तुलनात्मक धर्मशास्त्र आणि विज्ञानाचे तत्त्वज्ञान हा त्यांचा विशेष अभ्यास विषय होता. 'पॉझिटीव्ह सायन्स ओफ द एनशन्ट हिंदूज् ' हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. राजा राममोहन रॉय यांना "आधुनिक भारताचे जनक ' (दि फादर ऑफ मॉडर्न इंडिया) ही पदवी सील यांनीच दिली. 
      या नीतिशास्त्रानंतर भारतीय विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात, ग्रीक तत्त्वज्ञानातील मुकुटमणी सॉक्रेटीस आणि प्लेटो, अॅरिस्टॉटल, इमन्युएल कान्टहेगेलचा, त्यानंतर एफ. एच. ब्रॅडली यांचा तसेच बोझान्के, ग्रीन, बर्गासाँ, टेलर समावेश झाला. हेगेलीयन चिद्वाद व अद्वैत वेदांतातील ब्रह्म या संकल्पनेचा किंवा वेदांताचा विचार सुरु झाला. यात प्रामुख्याने हिरालाल हलदर (१८६५-१९४२) कृष्ण चंद्र भट्टाचार्य (१८७५-१९४९), योगी अरविंद (मृत्यू १९५०), म. गांधी, डॉ. राधाकृष्णन, कवी इक्बाल यांचा समवेश होतो.
       ढाका विद्यापीठात १९२१ ला तत्त्वज्ञान विभाग सुरु झाला. डॉ. जॉर्ज लांग्ले हे पहिले विभागप्रमुख आणि प्राध्यापक होते. याच वर्षी तेथे संस्कृत विभागही सुरु करण्यात आला. आज भारतापेक्षा तेथील तत्त्वज्ञान विभागात प्राध्यापकांची संख्या जास्त आहे. 
       खरे म्हणजे हे सारे अंदाज आहेत. कारण १९ वे शतक इतके धामधुमीचे व गतिमान होते की ' पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा भारतातील प्रवेश' असा काही विचार सुव्यवस्थितपणे तेंव्हा झालेला नव्हता. (आजही अद्यापि तो झालेला नाही.) उदाहरणार्थ, १९०२-३ साली मुंबई विद्यापीठात तत्त्वज्ञानाचा पूर्णवेळ एम. ए. चा अभ्यासक्रम होता, अशी नोंद रा. भा. पाटणकर त्यांच्या 'अपूर्ण क्रांती' या पुस्तकात (पान १३४) करतात. त्यांनी सगळा अभ्यासक्रम दिला आहे. तर दिवंगत प्रा. डॉ. एस. व्ही. बोकील यांच्या मते मुंबई विद्यापीठात १९१० साली तत्त्वज्ञान शिकविणे सुरु झाले, असावे. 
        विद्यापीठात पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास होणे साहजिक होते पण अन्यत्र ही तो अभ्यासला गेला असे उदाहरण दुर्मिळ आहे, हे रा. भा. पाटणकर दाखवून देतात (पान १२८..). महाराष्ट्र त्या अर्थाने सुदैवी आहे. १९२० ला वाई येथे गुरुवर्य नारायणशास्त्रीबुवा मराठे यांनी प्राज्ञमठ या नावाने पाठशाळा सुरु केली ते परंपरेचे ज्ञान विकसित करण्यासाठी. पण भारतीय तत्त्वज्ञानाच्या पंडितास आधुनिक राहण्यासाठी पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा समावेश त्यांच्या पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच त्यांनी केला होता.
         या इतिहासलेखनाची साधने अतिशय अपुरी आहेत. बहुधा इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहिलेले विविध प्रकारचे अहवाल आणि नंतर तत्त्वज्ञानाचे पदवीधारक झालेले भारतीय, किंबहुना प्राध्यापक झालेल्यांनी लिहिलेली आत्मचरित्र वजालेखनातून अतिशय त्रोटकपणे ही माहिती मिळते. भारतात पहिल्या प्रथम कोण, कुठे, कसे 'पाश्चात्य तत्त्वज्ञान' या नावाने कुणाला शिकविले, हे अज्ञात आहे. ' पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा भारतातील प्रवेशाचा इतिहास 'हाच मोठा संशोधनाचा इतिहास आहे. पुढील लेखात आपण ' पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा महाराष्ट्रातील प्रवेश' कसा झाला ते पाहू. 




























No comments:

Post a Comment