Thursday 31 July 2014

तत्त्वभान ३१ तत्त्वचिंतनाचे शत्रू ३१ जुलै २०१४



तत्त्वचिंतनाचे शत्रू

श्रीनिवास हेमाडे 
एखादा माणूस तर्कशास्त्रावर योग्य युक्तव सत्य न्याय देणारे बौद्धिक साधन म्हणून विश्वास ठेवतो, पण कालांतराने त्याच्या लक्षात येते की हे तर्कशास्त्र वेगवेगळ्या स्वार्थी कारणांसाठी वापरले जाते, तेव्हा तो माणूस तर्कशास्त्राचाच तिरस्कार करू लागतो. विशेषत: मित्र असे करतात, तेव्हा सारेच भावविश्व उद्ध्वस्त होते! मग सारीच बुद्धिमान माणसे तर्काचा, तर्कशक्तीचा आणि तर्कशास्त्राचा असा दुरुपयोग करतात, असे त्याला वाटू लागते..
          सॉक्रेटिसच्या मते प्रज्ञानाला विरोध होतो तो केवळ बुद्धिमत्तेकडून. तर्कबुद्धीला नीतीचा आधार नसेल तर बुद्धिमान तर्कज्ञ हाच समाजाला धोका असतो. तर्कबुद्धी विघातक कामासाठी वापरली की ती आत्म्याचा नाश करतेच पण समस्त मानवजातीचाही नाश करते. 
         ग्रीकांनी बुद्धिमत्ता आणि प्रज्ञान (Intellect आणि wisdom) यात फरक केला आणि प्रज्ञानाचे प्रेम म्हणजे तत्त्वज्ञान (Philosophy) अशी व्याख्या केली. आता एक प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे. तो असा : Philosophy या संज्ञेच्या विरुद्ध अर्थाची संज्ञा कोणती? भारतीय परिभाषेत बोलायचे तर 'दर्शन' या संज्ञेच्या विरुद्ध अर्थाची संज्ञा कोणती? 
    ग्रीक-पाश्चात्त्य परंपरेतील Philosophy या संज्ञेच्या विरुद्ध अर्थाची संज्ञा म्हणजे misology आणि misosophy. तर भारतीय परंपरेतील 'दर्शन'च्या विरुद्ध अर्थाची संज्ञा म्हणजे 'अदर्शन' (अदर्शनं लोप:) म्हणजे गुप्त, लुप्त होणे, न दिसणे; म्हणून त्याचे ज्ञान न होणे. पर्यायाने अज्ञान. 
      प्लेटोच्या फिडो (Phaedo) या संवादात philosophy च्या विरुद्ध misology आणि philosopher च्या विरुद्ध misologist या संज्ञा वापरल्या गेल्या आहेत. misology म्हणजे तर्काचा तिरस्कार (the hatred of logic) आणि misosophy म्हणजे प्रज्ञानाचा तिरस्कार (the hatred of wisdom). misology ही संज्ञा नेहमीच्या वापरात नसते. आणि प्रज्ञानाचा तिरस्कार या अर्थाने misosophy ही संज्ञा डेव्हिड कॉनवे (१९४७. विद्यमान ) या ब्रिटिश तत्त्ववेत्त्याने त्याच्या 'रिडिस्कव्हरी ऑफ विस्डम : फ्रॉम हिअर टू अ‍ॅन्टिक्विटी इन द क्वेस्ट ऑफ सोफिया, २०००) या ग्रंथात वापरली, असे थॉमस सोवेल (१९३० विद्यमान) हा अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व राजकीय तत्त्ववेत्ता लक्षात आणून देतो. नंतर misosophy misosophist misosophos हे शब्द हचिनसन शब्दकोशाने (२००८) स्वीकारले. तर्काचा व प्रज्ञानाचा तिरस्कार या अर्थाने कान्ट या जर्मन तत्त्ववेत्त्याने (१७८०) sology शब्द उपयोगात आणला. इंग्लंडमधील एक्स्टर युनिव्हर्सटिीच्या सामाजिक विज्ञान विभागात प्रॅग्मटिझम अ‍ॅन्ड इट्स एनिमीज या नावाचा अभ्यास विषय आहे. विसाव्या शतकातील फलवादी चळवळीचा चिकित्सक अभ्यास यात केला जातो. 
       फिडो हा संवाद अत्यंत हृद्य आहे, कारण हा सॉक्रेटिसचा अंतिम दिवस आहे. आपल्या देहान्ताच्या दिवशी सॉक्रेटिस त्याच्या मित्रांना माणसाचा सर्वात धोकादायक शत्रू कोण, त्याच्यापासून का व कसे सावध राहावे, याचा उपदेश करतो. या संवादात ताíकक दुष्टावा हा अनतिक बौद्धिक दुष्टावा कसा बनतो, याची चर्चा आहे. 
ज्ञान हाच सद्गुण हा सिद्धांत सॉक्रेटिसच्या जीवनाचा प्रकल्प होता. तो त्याने मृत्यूच्या क्षणापर्यंत अमलात आणला. ज्ञानाला नीतीचा, समाजहिताचा आधार नसेल तर असे ज्ञान व अशी ज्ञानी पण अनतिक माणसेच समाजाला धोकादायक असतात, हे सॉक्रेटिस या संवादातही स्पष्ट करतो. 
      या संवादातील सॉक्रेटिस ही सारी चर्चा मानवता विरोधाशी जोडतो. त्याच्या मते एखाद्याचा लोकांवरील वर्तनातील चांगुलपणावर विश्वास असेल तर तो सर्वच लोक मुळातून सचोटीने वागणारे आणि प्रामाणिक आहेत, असे समजतो. पण एखाद्याने जरी फसवले तरी तो सर्वाचा तिरस्कार करू लागतो. म्हणजे वर्तनातील चांगुलपणाचे जसे सार्वकिीकरण होते, तसे दुष्टपणाचेही सार्वकिीकरण होते. अगदी असेच तर्काच्या व विचाराच्या बाबतीतही घडते. एखादा माणूस तर्कशास्त्रावर योग्य युक्तव सत्य न्याय देणारे बौद्धिक साधन म्हणून विश्वास ठेवतो, पण कालांतराने त्याच्या लक्षात येते की हे तर्कशास्त्र वेगवेगळ्या स्वार्थी कारणांसाठी वापरले जाते, तेव्हा तो माणूस तर्कशास्त्राचाच तिरस्कार करू लागतो. विशेषत: मित्र असे करतात, तेव्हा सारेच भावविश्व उद्ध्वस्त होते! मग सारीच बुद्धिमान माणसे तर्काचा, तर्कशक्तीचा आणि तर्कशास्त्राचा असा दुरुपयोग करतात, असे त्याला वाटू लागते. तेच त्याचे 'ज्ञान' बनते. मग असा माणूस त्या एका दुरुपयोग करणाऱ्या माणसाचा शत्रू होता होता साऱ्या मानवजातीचाच शत्रू होतो! कालांतराने त्याचे स्वत:चे विपरीत तर्कशास्त्र तयार होते. तो त्यावरच श्रद्धा ठेवतो, मग तेच त्याच्यासोबतच्या इतरांना शिकवितो. हे तर्कशास्त्र बुद्धीच्या नव्हे तर भावनेच्या अंकित होते. तर्कविरोध आणि मानवविरोध अशा रीतीने एकत्रच जन्माला येतात. 
         प्लेटोच्या मते, अंध मत, विश्वास यांनाच सत्य मानणे आणि तर्क खरा न मानणे (युक्तिवाद अथवा चर्चा करण्यात सत्य नसते, अशी श्रद्धा बाळगणे) हा तर्काचा तिरस्कार आहे. अताíककता हा मानसिक आजार असून तो आत्म्याशी संबंधित आहे. हा अत्यंत निकडीचा, इमर्जन्सीचा रोग आहे. हा रोग झाला की लोकांना बोलण्यात, चर्चा करण्यात आत्मविश्वास वाटत नाही. काही काळाने त्यांना या रोगाची सवय होते, मग ते अज्ञानाच्या गुहेतील अंधारे आयुष्य जगू लागतात. शरीर आणि त्याच्या इच्छाच खऱ्या समजून ते जणू काही मद्यधुंद धूसर गोंधळलेल्या अवस्थेत जन्मभर राहतात. असा आत्मा रोगट बनतो. अशा रीतीने अताíककता हा आत्म्याचा रोग होतो. मग तो केवळ आत्मनाश करतो. 
       प्लेटोच्या या संकल्पनेतून दोन गोष्टी आढळतात, असे आज आपण म्हणू शकतो. माणूस बुद्धिमान प्राणी आहे, हे अ‍ॅरिस्टॉटलचे म्हणणे मान्य केले तरी समाजात सर्वच माणसे बुद्धिमान नसतात; बरीच माणसे साधी, भाबडी असतात. पण काही माणसे तरी बुद्धिमान असतात. प्लेटोच्या म्हणण्यानुसार या बुद्धिमान माणसांवर नतिक वागण्याची विशेष सामाजिक जबाबदारी असते. कारण असा बुद्धिमान, ज्ञानी माणूस जेव्हा साध्या-भाबडय़ा माणसाला फसवितो तेव्हा त्या भाबडय़ा माणसाचा माणुसकीवरील विश्वास संपतोच, पण त्या दुष्ट अनुभवातून त्या भाबडय़ा माणसाचे स्वत:चे स्व-तंत्र तर्कदुष्ट तर्कशास्त्र बनते. ते दुष्ट मानसिकता निर्माण करते. ते निर्घृण होण्याचा धोका संभवतो. तो सत्ताधीश झाला की साऱ्या मानवजातीलाच धोक्यात आणू शकतो. लोकशाहीत असे घडू शकते. या तर्कदुष्ट तर्कशास्त्राच्या वरवंटय़ातून बुद्धिमान, ज्ञानी माणसेही वगळली जात नाहीत! 
     'ज्ञानाचे प्रेमिक'च्या विरुद्ध 'अज्ञानाचे प्रेमिक' असे कधी नसते, हे खरे. पण ज्यांना हुशार बुद्धिमान व्यक्ती म्हणून ओळखले जाते त्यांनी बुद्धीचा गरउपयोग केला की ते 'अज्ञानाचे प्रेमिक' बनतात. त्यांच्या स्वार्थामुळे साध्या-सरळ माणसाचा आधी बुद्धीवरील, तर्कावरील विश्वास उडतो आणि नंतर बुद्धिमान माणसावरील विश्वास लयास जातो. मग सारी माणसे अशीच स्वार्थी असतात, असे त्याचे ज्ञान पक्के बनते. ती श्रद्धा होते. हा भाबडा माणूस मग कशावरही विश्वास ठेवू लागतो. तो हळूहळू मानवताविरोधी बनतो. हे घडू नये, यासाठी बुद्धिमान असण्याबरोबर ज्ञानी माणसाने सद्गुणी असणेही अनिवार्य असते. बुद्धिमान पण दुर्गुणी माणसे, सॉक्रेटिसच्या मते खरी ज्ञानी नसतातच, ती केवळ 'मिथ्या ज्ञानी' असतात. तत्त्वचिंतनाचे, समाजाचे हेच शत्रू असतात. 
     भारतात तर्काचे शत्रू असा काही प्रकार नव्हता, उलट तर्क हाच शत्रू मानला गेला. परिणामी तर्कशास्त्राचा प्रसार आणि प्रचार तर झाला नाहीच, पण लोक विचारशक्तीच हरवून बसले. इंग्रजी विद्य्ोच्या दबावामुळे विद्यापीठे व महाविद्यालयांत तर्कशास्त्र हा विषय सुरू झाला आणि आज अनेक ठिकाणी तो बंद पडला. खरे तर शालेय स्तरावर जिथे विचार कसा करावा, याचे शास्त्रशुद्ध शिक्षण द्यावयाचे असते तिथे हा विषय असावा तर तिथे तो बेपत्ता आहे.



Thursday 24 July 2014

तत्त्वभान ३० मूल्यशास्त्रे आणि मूल्यसंघर्ष २४ जुलै २०१४

मूल्यशास्त्रे आणि मूल्यसंघर्ष
श्रीनिवास हेमाडे
 
axilology nad value conflicts 
'वस्तुनिष्ठ मूल्ये नावाची गोष्टच कधी अस्तित्वात नसते, पण तसे समजणे म्हणजे मूल्यविषयक भ्रम करून घेणे असते' हे जॉन मॅकी यांचे प्रतिपादन  नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्रात नवी रुजवात घालणारे ठरले..

       'मूल्य' या तात्त्विक संकल्पनेचे स्वरूप अतिशय गुंतागुंतीचे आहे. तिचे विश्लेषण न करता, ती समजावून न घेता व्यवहारात सर्रास उपयोगात आणली जाते आणि मग एकच मूल्यसंघर्ष निर्माण होतो. व्यक्तिगत व सामूहिक जीवनकलह तीव्र बनतो. मूल्य संकल्पनेच्या रहस्याचे आकलन झाले तर अटळ जीवनकलहाची तीव्रता सहन करणे सोपे जाते.
       मूल्य (value) हा शब्द 'आर्थिक मूल्य' अशा अर्थाने अ‍ॅडम स्मिथने उपयोगात आणला. नंतर रुडॉल्फ हरमन लोत्झ (१८१७-१८८१), आल्ब्रेख्त रिचेल (१८२२-१८८९), नीत्शे (१९४४-१९००), अलेक्स मायनाँग (१८५३-१९२०), एडवर्ड हॉर्टमन (१९४२-१९०६), विल्बुर अर्बन (१८७३-१९५२), आर. बी. पेरी (१८७६-१९५७) या तत्त्वचिंतकांनी त्याला व्यापक अर्थ दिला. या व्यापक अर्थाने तो शब्द अर्थशास्त्रासह नीती, धर्म, कला, विज्ञान, कायदा, रूढी व राज्यशास्त्र इत्यादी क्षेत्रांत रुळला. आजकाल वाङ्मयीनमूल्ये, जीवनमूल्ये, लोकशाहीमूल्ये अशा तऱ्हेचे शब्दप्रयोग आपल्या बोलण्या-लिहिण्यात येतात ते याच अर्थाने. या ठिकाणी 'मूल्य' शब्दाने नेमके काय कळते, मूल्य हा काही वस्तुगत धर्म आहे की मनुष्यकृत आरोपण आहे, मूल्यांची प्रतवारी किंवा वर्गीकरणात्मक व्यवस्था लावता येईल काय, याचा विचार आवश्यक असतो. मूल्यांचे स्वरूप, त्यांचे प्रकार, त्यांचे परस्परसंबंध, त्यांच्या प्रामाण्याचा आधार यांचा काटेकोर तार्किक विश्लेषणात्मक विचार करणारी अशी तत्त्वज्ञानाची शाखा म्हणजे मूल्यशास्त्र अथवा मूल्यमीमांसा (अ‍ॅक्सिऑलॉजी).
           तत्त्वज्ञानात नीतिशास्त्र व सौंदर्यशास्त्र यांना मूल्यशास्त्रे मानले आहे. जगताना मूल्यसंघर्ष होतो, याचा अर्थ मुख्यत: या दोन क्षेत्रांत संघर्ष होतो.
         प्रथम हा टकराव नीतिशास्त्रात कसा उद्भवतो, ते पाहू. वर्णनात्मक नीतिशास्त्र आदर्शवादी नीतिशास्त्र, अधिनीतिशास्त्र आणि उपयोजित नीतिशास्त्र हे नीतिशास्त्राचे चार प्रकार लक्षात घेता मूल्यसंघर्ष पुढीलप्रमाणे निर्माण होतो.
             वर्णनात्मक नीतिशास्त्र लोकांच्या नतिकतेच्या रेडीमेड श्रद्धा, विश्वास व संकल्पना यांचे वर्णन करते. आदर्शवादी नीतिशास्त्र, कुणी तरी सांगितलेली नीती पाळणे कसे योग्य आहे, हे सांगते. अधिनीतिशास्त्र त्यांची काटेकोर तार्किक चिकित्सा करू पाहाते. उपयोजित नीतिशास्त्र व्यक्तीचे खासगी जीवन आणि तिचे सार्वजनिक जीवन यातील फरकानुसार नतिक निकष बनविले पाहिजेत, असा सिद्धांत मांडते.
          आता, संघर्ष निर्माण कुठे होतो? नीतिशास्त्रात तो दोन प्रकारे निर्माण होतो. वर्णनात्मक नीती व आदर्शवादी नीतीनुसार एखाद्या गोष्टीचे वर्णन करणे, हे एका अर्थाने आदेश देणेच असते. त्यामुळे या दोन्ही नीती सक्तीच्या पाळावयाच्या पारंपरिक नीती ठरतात, पण त्यांना प्रश्न विचारला म्हणजे परंपरेपलीकडे, अधिपातळीवर म्हणजे अधिनीतिशास्त्रीय पातळीवर आपण गेलो की परंपरा आणि नवता यात संघर्ष सुरू होतो. उदाहरणार्थ, काळा-गोरा हा वर्णभेद, जातिभेद, िलगभेद, 'परधर्मो भयावह:' या परंपरा असून त्या पाळणे चांगले असते, हे आदर्श आहेत. पण 'गोरेपण-उच्च जात किंवा पुरुष असणे चांगले कसे,' असा प्रश्न अधिपातळीवर जाऊन विचारला की संघर्ष, तणाव निर्माण होतो. एखादी गोष्ट आदर्शवादी मानली की तिला 'का?' म्हटले की ती परंपरेला आव्हान देते. मी कोणती नीती निवडणार? हा या संघर्षांचा पाया बनतो. हा पहिला प्रकार आहे.
         नीतिशास्त्रातील संघर्षांचा दुसरा प्रकार अगदी अलीकडे निर्माण झाला. उपयोजित नीतिशास्त्र व्यवसायाचे नीतिशास्त्र रचू पाहते. त्या क्षेत्रात हा संघर्ष ठळकपणे दिसून येतो. उपयोजित नीतिशास्त्र समाजसेवा (Social Service), पेशा (Vocation), व्यवसाय (Profession), धंदा (Business), नफेखोरीचा धंदा (trade) आणि उद्योगसमूह (Corporation / Company) यांत नेमका फरक करते. पण तो कागदावरच राहिला. प्रत्यक्षात रोजच्या जगण्यात यातील नेमके आपण काय निवडले आहे? हा अधिपातळीवरील प्रश्न विचारला की संघर्ष निर्माण झालाच! शिक्षण, शेती, परराष्ट्र धोरण किंवा वेश्याव्यवसाय यांत फरक कसा करणार? (वेश्याव्यवसाय, एस्कॉर्ट अव्हेलेबल हा व्यवसाय की सामाजिक दुरित? हा तर एक स्वतंत्र नतिक प्रश्न आहे.)
        भारतात तर कोणत्याही सामाजिक कृतीचे रूपांतर नफेखोरीच्या धंद्यात होऊ शकते. गप्पा मारणे या साध्या-सरळ गोष्टीचा व्यवसाय झाला की 'गप्पाष्टक' हा धंदा होतो. शिक्षण, सुशिक्षित नागरिक, शेती, बँकिंग, नागरी सेवा इत्यादी देशाची गरज आहे की चन आहे, याचा व्यापक विचार न झाल्याने त्याचे रूपांतर नफेखोरीच्या धंद्यात झाले आहे. विशेषत: राजकारण हा सेवा की धंदा? हा नतिक पेच आहे. तेच उद्योगसमूहाचे. उद्योगसमूहाची सामाजिक जबाबदारी (सी.एस.आर.) आणि प्रत्यक्ष त्या समूहाचे नतिक समजले जाणारे वर्तन यात फरक आहे.
           याचा अर्थ असा की, अधिनीतिशास्त्र आणि उपयोजित नीतिशास्त्र यांच्यात हा संघर्ष निर्माण झाला आहे. याचे अगदी अचूक वर्णन तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक शि. स. अंतरकर यांनी केले आहे. त्यांच्या मते, उपयोजित नीतिशास्त्र म्हणजे 'सोयीस्करतेचे नीतिशास्त्र' बनले आहे. उपयोजित असणे, या मूलभूत नतिक विचारात व्यापक समाजहिताचा विचार गृहीत असतो, त्याचा बळी द्यावयाचा नसतो. व्यापक समाजहिताशी सुसंगत राहूनच प्रत्येक सामाजिक कृतीची- व्यवसाय, धंदा इत्यादीची नीती रचली पाहिजे. पण समाजहिताचा बळी देऊनच आपापल्या सोयीनुसार व्यवसाय केला गेला की यादवी छेडली जाते.
          आता, सौंदर्यशास्त्रात हा मूल्यसंघर्ष कसा निर्माण होतो, ते पाहू. सौंदर्यवाचक विधान निसर्गविषयक किंवा मानवनिर्मित कलाकृतीबाबत असते, तेव्हा काही बिघडत नाही. पण सौंदर्यवाचक विधान प्रत्यक्ष खुद्द माणसाला लागू केले की ते नतिक विधान बनते आणि संघर्ष सुरू होतो. जसे की 'मुलगी सुंदर आहे' आणि 'मुलगी सुंदर नाही' ही दोन विधाने वरपांगी सौंदर्यविधान दिसत असली, तरी ही व अशा प्रकारची इतर विधाने सौंदर्यवाचक विधान न राहता त्यांचे रूपांतर नतिक विधानात होते. 'मुलगी काळी आहे' हे विधान तर अनतिक विधान बनते. इथे सौंदर्यशास्त्रीय आणि नीतिशास्त्रीय संघर्ष सुरू होतो. ही मांडणी प्रो. सुरेंद्र बारिलगे यांनी 'मूल्य, मूल्ये आणि मूल्यव्यवस्था' या लेखात केली आहे. त्यांच्या मते, मूल्य ही निखळ मानवकेंद्रित संकल्पना आहे. तिचे आरोपण जग किंवा निसर्गनियम यांच्यावर करता येत नाही.
         खरे तर मूल्य संकल्पनेचे स्वरूप दुहेरी असते. व्यक्तीव समाजाच्या जगण्यात कोणती ना कोणती मूल्ये असतात. या अर्थाने मूल्ये चिरंतन असतात पण त्यांचा स्थलकाल परिस्थितीनुसार आशय बदलत राहतो. या अनिश्चिततेमुळे मूल्ये भ्रामक बनतात. 'वस्तुनिष्ठ मूल्ये नावाची गोष्टच कधी अस्तित्वात नसते, पण तसे समजणे म्हणजे मूल्यविषयक भ्रम करून घेणे असते' असा 'मूल्याचा भ्रम सिद्धान्त' जॉन लेस्ली मॅकी (१९१७-१९८१) या ऑस्ट्रेलियन तत्त्ववेत्त्याने त्याच्या 'एथिक्स : इन्व्हेिन्टग राइट अ‍ॅण्ड राँग (१९७७) या पुस्तकात मांडला. त्याच्या मते, 'नीतिशास्त्र कुणी तरी (धर्म, प्रेषित, साधुसंत इ. ) आधीच आयते तयार ठेवले आहे आणि आपण ते केवळ शोधून (डिस्कव्हरी) अमलात आणावयाचे आहे, असे कधी नसते. नीतिशास्त्र प्रत्येक काळात नव्याने शोधावयाचे (इन्व्हेन्शन) असते.'
       मॅकीचा नियम सौंदर्यशास्त्रालाही लागू होतो. त्यामुळे 'दलित सौंदर्यशास्त्र' किंवा 'काळ्यांचे सौंदर्यशास्त्र' या संकल्पना आणि साहित्य निर्माण करणे शक्य होते. स्त्रीवादी दृष्टिकोनानुसार पाहता 'व्हॅल्यू'चा अर्थ पुरुषी उन्मत्तपणा किंवा 'पुरुष जे ठरवितो तेच' असा आहे. हे तर संघर्षांचे आणखी तीव्र क्षेत्र आहे.
 
 
 
दोन पत्रे
 
१) गैरसमज वाढविणारे लिखाण - डॉ. प्रशांत बागड भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, कानपूर येथे तत्त्वज्ञानाचे साहाय्यक प्राध्यापक
 

Wednesday 16 July 2014

तत्त्वभान २९ सौंदर्यशास्त्र.. केवळ गैरसमज ! १७ जुलै २०१४

Aesthetics, Only misconception!
मोनालिसा ! 

सौंदर्यशास्त्र.. केवळ गैरसमज!
श्रीनिवास हेमाडे

ज्या ज्ञानक्षेत्राच्या उगमापासून केवळ गरसमजच निर्माण झाले असे क्षेत्र म्हणजे सौंदर्यशास्त्र. नीती या संकल्पनेपेक्षा सुंदर ही संकल्पना अधिक दारुण आणि अतिशय क्रूरपणे हत्यार म्हणून वापरली गेली, सुंदरतेचा अस्सल चेहरा भीषण आहे, हा ठळक आक्षेप विसाव्या शतकात घेण्यात आला. तरीही सौंदर्यशास्त्र हा एक विचारविषय म्हणून सर्वप्रियच!

      सौंदर्यशास्त्र (Aesthetics) ही तत्त्वज्ञानाची शाखा आहे. याला सद्भिरुचिशास्त्र, ललितकलांविषयी तत्त्वज्ञान, कलेचे तत्त्वज्ञान (Philosophy of Art) अशी नावे आहेत. तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक विवेक गोखले यांनी 'आभिरौचिकी' अशी संज्ञा सुचविली आहे. 
        'सुंदर' या शब्दाने एखाद्या गुणधर्माचा निर्देश होतो का? असल्यास त्याची व्याख्या करता येते का? त्याचे निकष देता येतात का? म्हणजे (१) कोणत्या गोष्टी सुंदर आहेत? कोणत्या गुणांमुळे त्या सुंदर ठरतात? सौंदर्याचे निकष कोणते? (२) सौंदर्य या संकल्पनेची ताíकक वैशिष्टय़े कोणती? सौंदर्यविधानाचे स्वरूप काय? हे सौंदर्यशास्त्राचे प्रश्न आहेत. 
      कला आणि ज्यात सौंदर्यानुभव आणि सौंदर्यमूल्ये यांचा संबंध येतो त्या परिस्थितीचा अभ्यास सौंदर्यशास्त्र करते. म्हणजे कलेची तात्त्विक चिकित्सा आणि सौंदर्यात्मक प्रतिक्रिया आणि सौंदर्य विधानांचे ताíकक विश्लेषण यांचा अभ्यास यात होतो. कला म्हणजे काय? कलाकृती किंवा निसर्गदृश्य पाहताना ज्या अभिवृत्तीने आपण प्रेरित होऊन पाहतो त्या अभिवृत्तीचे स्वरूप काय? सौंदर्यानुभव म्हणजे नेमका कोणता अनुभव? त्याचे निकष कोणते? कलावस्तूच्या स्वरूपाचे आणि कलास्वादाचे, रसग्रहणाचे स्वरूप व निकष कोणते? स्थलकालसापेक्ष असते की निरपेक्ष असते? कला व नीती, कला व धर्म यांचा संबंध असतो का? याचा अभ्यास सौंदर्यशास्त्रात होतो. 
         हे प्रश्न समीक्षात्मक विधानांच्या व त्यात वापरल्या गेलेल्या संकल्पनांच्या ताíकक स्वरूपाविषयीचे प्रश्न आहेत, हे लक्षात घेतले तर सौंदर्यशास्त्राचे स्वरूप असे होईल : कलाकृती व इतर सुंदर वस्तू यांच्याबद्दल विधाने ही सौंदर्यविधाने असतात. त्यांची चिकित्सा करताना जी विधाने केली जातात, त्यात वापरल्या गेलेल्या संकल्पनांचे ताíकक विश्लेषण करणे हे सौंदर्यशास्त्राचे एक प्रमुख कार्य आहे. 
     सौंदर्यशास्त्र हे विज्ञान नाही, त्याचप्रमाणे ते तंत्रविद्याही नाही. म्हणून सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासाने माणसाला कलाकृती निर्माण करण्याचे तंत्र कळेल, असे नाही. त्याचप्रमाणे अरसिक माणसाला रसिक बनविण्याचे कार्यही सौंदर्यशास्त्राचे नाही. सौंदर्यशास्त्र हे समीक्षाव्यापारात वापरल्या जाणाऱ्या संकल्पनांचे, संज्ञांचे, मूल्यविधानांचे, सौंदर्यादी संकल्पनांच्या निकषांचे शास्त्र आहे. ज्या संकल्पनाव्यूहामुळे आपले समीक्षाव्यापार सिद्ध होतात त्याचा संपूर्ण नकाशा आपल्यापुढे उभा करणे हे सौंदर्यशास्त्राचे कार्य आहे. सौंदर्यविषयक जाणिवा निर्माण करणे हे सौंदर्यशास्त्रज्ञाचे काम नव्हे, असे समीक्षक रा. भा. पाटणकर अचूकपणे स्पष्ट करतात.
        प्राचीन ग्रीक काळापासून सौंदर्यशास्त्र बरेच निसरडे व वादग्रस्त ठरले. त्यामुळे अनेकांनी कायमच कठोर आणि उपहासपूर्ण टीका केल्या. जे. ए. पसमोर या तत्त्वचिंतकाने Dreariness of Aesthetics सौंदर्यशास्त्रातील भयाणपणा, असा लेख लिहिला, तर सी. डी. ब्रॉडच्या मते हा 'अतिशय कंटाळवाणा.. भंपक विषय' आहे. आयर्विंग बॅबिट हा तत्त्ववेत्ता Nightmare Science - 'भयावह विज्ञान' म्हणतो. 
        विसाव्या शतकाच्या अखेरी भाषाशास्त्र, साहित्यशास्त्र, मूल्यशास्त्र तसे ललितकला, सिनेमा, फोटोग्राफी, व्हिडीओ आणि इलेक्ट्रॉनिक व संगणकीय कलांचा विकास झाला. परिणामी अनेक स्वयंघोषित सौंदर्यशास्त्रज्ञ जन्माला आले. याचा घातक सामाजिक परिणाम इंटरनेटवरही दिसतो. Aesthetics, Aesthetician , Beauty असे शब्द शोधयंत्राला दिले की ते सुगंधी पावडरी, तेले, फॅशनी, नेलपॉलिश इत्यादी सौंदर्य प्रसाधनांची 'स्थळे' दाखविते. एका अर्थाने ते सौंदर्यशास्त्राची जागा दाखविते. भरीस भर म्हणून ब्युटी पार्लर्सच्या संचालिका स्वत:ला सौंदर्यशास्त्रज्ञ म्हणवून घेतात! 
       विशेषत: भाषासमीक्षा आणि सौंदर्यशास्त्र यांचा तोंडवळा सारखा असल्याने तत्त्वचिंतकापेक्षा साहित्यिक आणि भाषेचे अभ्यासक सौंदर्यशास्त्रावर (चिंताजनक) लेखन करू लागले. सौंदर्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी किंवा ते शिकविण्यासाठी अभ्यासकाला साहित्याचे ज्ञान, समीक्षेचे ज्ञान असणे आवश्यक आहेच; पण वस्तुनिष्ठ संकल्पनात्मक चिकित्सेसाठी तत्त्वज्ञानाचे ज्ञान अनिवार्य असते, याचे भान विसरले गेले. 
     आधुनिकोत्तर काळात सौंदर्यशास्त्राबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला. सौंदर्यशास्त्राचा सुंदर चेहरा बिघडला! विशेषत: मिशेल फुको (१९२६-८४) या फ्रेंच विचारवंताने सौंदर्यशास्त्र हा राजकीय सत्तेचा खेळ आहे, हे सिद्ध केले. परिणामी देरीदा, रिचर्ड रॉर्टी, पॉल डीमॅन यांनी बरेच जोरदार आक्षेप घेतले. सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनांमध्ये दडलेली प्राणी हत्या आणि इतर कुरूपता हा तर भयानक विषय आहे. 
      स्त्रीवादानेही एकूण जागतिक सौंदर्यशास्त्रावर मोठा आक्षेप घेतला. त्यातून Womanism ही स्वतंत्र स्त्री चळवळ अस्तित्वात आली. Womanism म्हणजे काळा स्त्रीवाद. 'काळे तेच सुंदर' ही यांची घोषणा आहे.Feminism म्हणजे गोरा स्त्रीवाद. काळा स्त्रीवाद काळ्या स्त्रीचे दु:ख मांडतेच पण तो काळ्या पुरुषाचेही दु:ख चव्हाटय़ावर आणतो, असा दावा काळा स्त्रीवाद करतो. भारतीय विचारविश्वात हा आक्षेप १९८०च्या दशकात 'दलित सौंदर्यशास्त्रा'चे आव्हान या रूपात आला. ज्ञान, विचार, नीती आणि सौंदर्य या मुख्य तत्त्वांसंदर्भात सूक्ष्म हिंसेचे राजकारण करून ते नेहमी जिंकत राहतात, हा त्यांचा मुख्य आक्षेप आहे. 
      भारतात सौंदर्यशास्त्राला प्राचीन परंपरा आहे. पण ते संस्कृत साहित्यशास्त्र या नावाने विकसित झाले. सौंदर्यशास्त्र या नावाने नाही. त्यात कलामीमांसा आणि साहित्यमीमांसा दोन्हीचा समावेश होतो. शब्दार्थ विचार, अलंकार, रीती, ध्वनी, वक्रोक्ती, रस या यातील मुख्य संकल्पना असून, भरतमुनी (इ.स.पू. पहिले शतक) ते जगन्नाथ पंडित (१७ वे शतक) असा व्यापक पट या परंपरेचा आहे. पण भारतीय सौंदर्यशास्त्र मूलत: वैदिक आहे, त्यात जैन आणि बौद्ध दर्शने व धर्म यांच्यातील कलाविचारांचा समावेश केला जात नाही. प्राचीन भारतीय मीमांसेत अभिजात संस्कृतीमध्ये आणि केवळ संस्कृत ग्रंथामध्ये ग्रथित झालेलीच मीमांसा येते. त्यात अन्य सांस्कृतिक उपप्रवाहांची मीमांसा अभिप्रेत नाही, अर्थातच ही भूमिका योग्य नाही. आपली साहित्य जिज्ञासा संस्कृतच्या शिवेपाशी खुंटणे हे काही बरे नाही, असे मत प्रसिद्ध विचारवंत व भाषातज्ज्ञ अशोक केळकर यांनी व्यक्त केले आहे. 
      मराठीत सौंदर्यशास्त्रावर उदंड लेखन झाले. तो वेगळ्या स्वतंत्र मोठय़ा लेखनाचा विषय आहे. ब्राह्मणी-अब्राह्मणी असा वादही त्यातून निर्माण झाला. पण मराठीतील लेखनामुळे सौंदर्यशास्त्राचे मूळ तत्त्वज्ञानात असताना ते मराठी समीक्षेची मिरासदारी बनली. तत्त्वज्ञानाचा पायाच नसल्याने बहुतेक लेखन ठिसूळ राहिले. मर्ढेकर, शरद पाटील, सुरेंद्र बारिलगे, मे. पुं. रेगे, प्रभाकर पाध्ये, रा. भा. पाटणकर यांच्यापर्यंत लेखनाच्या तात्त्विक पातळीची जाणीव होती, पण नंतर ती दुर्दैवाने राहिली नाही, असे खेदाने म्हणावे लागते. 
     सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या 'त्याचे सौंदर्यवाचक विधान' या विनोदी लेखात सौंदर्यशास्त्राची योग्य टिंगल (आणि टवाळी) केली आहे. त्यांच्या विवेचनात ते काही विधाने करतात आणि त्या प्रत्येकाला एकेक आद्याक्षर देतात. त्यातून अखेरीस एक वाक्य तयार होते. 'एक अक्षर कळलं तर शपथ!' अर्थात पुलंना टवाळीचा विषय तत्कालीन मराठी लेखकांनी अतिशय अवघड लेखन करून दिला, त्यात काही मान्यवरांचाही समावेश आहे.

Sunday 13 July 2014

तत्त्वभान २८ नीतिशास्त्र .. मोठ्ठा प्रश्न ! १० जुलै २०१४



नीतिशास्त्र .. मोठ्ठा प्रश्न !
श्रीनिवास हेमाडे
The Good, the Bad and the Ugly
चांगले, वाईट, कुरूप यांच्या भूमिका एखाद्या चित्रपटात ठरलेल्याच असणे ठीक; पण जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये चांगल्या-वाइटाचा तत्त्वाधिष्ठित निर्णय- किंवा 'नीतिनिर्णय' करणे हे मोठेच काम ठरते.. आजच्या नीतिशास्त्रात व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजशरणता हे दुमत दिसतेच, परंतु हे झगडे न वाढवता नीतिशास्त्राने स्वतचा शाखाविस्तार कसा केला, हेही दिसते! 
         भारतात धर्म हीच नीती मानली गेली. ती जीवनाची स्वतंत्र क्षेत्रे आहेत, हा फरक केला गेला नाही. त्यामुळे स्वतंत्र नीतिशास्त्र अस्तित्वात आले नाही. धार्मिक व्यक्ती हीच नतिक मानली गेली. आज समाजसेवा व धंदा हे अद्वैत मानून धर्म, मंदिरे, समाजसेवा, जात, लग्न यांचाही व्यवसाय झाला! 
          नीती, नतिकता, नीतिमत्ता या आणि अशा काही संकल्पना माणसाच्या आयुष्यात अतिशय वादग्रस्त ठरत आल्या आहेत. कर्तव्य, जबाबदारी, बंधन, बांधीलकी, त्याग, न्याय, समता, निष्ठा, देशप्रेम, धर्म, धार्मिकता, प्रेम, मत्री, करुणा या काही नतिक संकल्पना आहेत. त्यांच्याविषयी सुसंगत, ताíकक विचार करणे म्हणजे नीतिशास्त्र रचणे असते. नीती हा केवळ आचरणाचा विषय नाही, तो ज्ञानाचाही विषय असतो, याचे भान जागे करणे, ते विकसित करणे, त्याबद्दल सातत्याने चिंतन करणे, नीतिशास्त्रावर संशोधन करणे, हा समाज आणि ज्ञान या दोन्ही क्षेत्रांच्या विकासाचा पाया असतो. 
         नीतीला इंग्रजीत Ethics किंवा Moral Philosophy असा शब्द आहे. Ethics हा प्राचीन ग्रीक भाषेतीली ethos या शब्दापासून बनतो. Ethos म्हणजे सामाजिक चालीरीती, सर्वमान्य वर्तन. तोच Moras या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे माणसाच्या समान वागण्याच्या नियमांना moral म्हटले जाते. संस्कृत किंवा मराठीतील नीती म्हणजे नेणे, नेणारी. पर्यायाने, एका विशिष्ट मार्गाने घेऊन जाणारी नियमावली, असा होतो. 
नीतिशास्त्र ही तत्त्वज्ञानाची एक शाखा आहे, असे मानले जाते. चांगले (शिव) म्हणजे काय? ही नीतिशास्त्राची खूप मोठी मूलभूत समस्या आहे. नीतिशास्त्राचे स्वरूप आणि प्रयोजन याविषयी तत्त्ववेत्त्यांमध्ये मूलभूत मतभेद असतात. 
        माणसाचे कल्याण आणि त्याची कर्तव्ये यांच्यातील परस्परसंबंधाचे ज्ञान करून देणे हा नीतिशास्त्राचा हेतू आहे, असे पाश्चात्त्य परंपरेतील प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल, एपिक्यूरस, हॉब्ज, स्पिनोझा, बटलर, कांट, जॉन स्टुअर्ट मिल इत्यादी अभिजात तत्त्ववेत्ते मानतात. अर्थात याचा अर्थ असा नाही, की एखाद्या विशिष्ट माणसाने विशिष्ट प्रसंगी काय करावे याविषयीचा सल्ला देणे, उपदेश करणे हे नीतिशास्त्रज्ञाचे वा नतिक तत्त्ववेत्त्याचे काम असते, पण या प्रकारचे निर्णय ज्या मूलभूत सामान्य तत्त्वांना अनुसरून घेतले पाहिजेत ती विशिष्ट तत्त्वे स्पष्ट करणे आणि त्यांचे प्रामाण्य सिद्ध करणे, हे नीतिशास्त्राचे कार्य आहे. एखादा नीतिमान प्रेषित किंवा प्रतिभावंत कवी माणसाच्या नतिक समस्यांचे मर्म उघड करणारा दृष्टिकोन प्रभावी रीतीने मांडताना अनेकदा आढळतो. नीतिशास्त्रज्ञ तत्त्वांची व्यवस्था लावण्यासाठी पद्धतशीर ताíकक युक्तिवाद करतो, त्याचे समर्थन करतो. असे प्रेषित किंवा कवी करीत नाही. या फरकामुळे नीतिशास्त्रज्ञ प्रेषित किंवा कवी यांच्याहून वेगळा ठरतो. साहजिकच प्रेषिताचा संदेश किंवा कवीची नतिक शिकवण यापेक्षा तात्त्विक नीतिशास्त्राचे स्वरूप वेगळे ठरते. नतिक संकल्पनांचा इतिहास पाहता, नीतिशास्त्राचे चार प्रकार मानले गेले. वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) नीतिशास्त्र, आदर्शवादी (नॉम्रेटिव्ह किंवा प्रिस्क्रिप्टिव्ह) नीतिशास्त्र, अधिनीतिशास्त्र (मेटाएथिक्स), उपयोजित नीतिशास्त्र (अप्लाइड एथिक्स). 
       लोकांच्या नतिकतेच्या श्रद्धा, विश्वास व संकल्पना कोणत्या व कशा स्वरूपाच्या असतात, याचे वर्णन करणे ही वर्णनात्मक नीती. उदाहरणार्थ एखाद्या देशाची जीवनपद्धती पाहून त्यांची नतिकता स्पष्ट करणे. धर्मशास्त्र, धर्मग्रंथ अशा रेडिमेड श्रद्धा देतात. कोणती कृती केली असता लोक आपणास सज्जन म्हणतील, म्हणजेच चांगल्या जीवनाचे स्वरूप कसे असते, हे नीतिशास्त्र स्पष्ट करते. ही परंपरा बनते. यात व्यक्तिस्वातंत्र्य नसते. 
      आता लोकांनी कसे वागले पाहिजे, जीवनात काय प्राप्त केले पाहिजे, याचे नियम बनविणे, त्यानुसार त्यांचे आचरण होते आहे हे पाहणे, ही आदर्शवादी नीती असते. हे नीतिशास्त्र, चांगल्या जीवनाचे स्वरूप कसे असते हे सांगताना, माणसाने कशा प्रकारे जगावे, त्याने काय साधावे, काय करावे हे सांगत असते. व्यवहाराचे मार्गदर्शन, नियमन करणे हे या नीतिशास्त्राचे उद्दिष्ट असते. उदाहरणार्थ स्वर्ग, सुख अथवा मोक्ष, निर्वाण, मुक्ती हे जीवनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे माणसाने साधकाचे साधे जीवन अंगीकारावे, ते चांगले, आदर्श जीवन होय. आदर्श सांगणे, कुणी तरी सांगितलेली (प्रिस्क्रिप्शन) नीती पाळणे, हीच नीती. यातही व्यक्तिस्वातंत्र्य नसते. 
      पण आता, चांगले म्हणजे काय, असा प्रश्न उपस्थित केला तर त्याची चिकित्सा सुरू होते. तार्किक विश्लेषण करून नतिक संकल्पनांचे स्वरूप स्पष्ट करणे हे नीतिशास्त्राचे काम आहे, असे सांगते ते अधिनीतिशास्त्र. व्यवहारात नतिक निर्णय घेताना, स्वत:च्या व इतरांच्या वर्तनाचे मूल्यमापन करताना आपण ज्या संकल्पना वापरतो त्यांचे विश्लेषण व त्यांची व्याख्या करणे, त्यांचे परस्परांमधील संबंध स्पष्ट करणे, या संकल्पनांचे स्वरूप व प्रयोजन निश्चित करताना इतर क्षेत्रांतील (विज्ञान, कला) संकल्पनांहून त्या भिन्न कशा आहेत, याचा शोध घेणे, हे अधिनीतिशास्त्राचे कार्य असते. थोडक्यात, नतिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या भाषेचे तर्कशास्त्र स्पष्ट करणे हे नीतिशास्त्राचे प्रयोजन असते, असे अधिनीतिशास्त्र सांगते. ते नीतीच्या पलीकडे ('मेटा' म्हणजे पलीकडे, 'अधि') जाते. ते केवळ नीती मानत नाही, तर ती नतिक तत्त्वे, नियम का मानावेत, याची त्यापलीकडे जाऊन चर्चा करते, म्हणून तिला अधिनीतिशास्त्र म्हणतात. यात व्यक्तिस्वातंत्र्य असते. जी. ई. मूर या तत्त्ववेत्त्याच्या प्रिन्सिपिया एथिका (१९०३) (Principia Ethica) या ग्रंथाने अधिनीतिशास्त्रातील प्रश्नांकडे लक्ष वेधून घेतले. मूरच्या मते, 'चांगले' हे पद आदर्शवादी मानले तर 'चांगले' या पदाचा नेमका अर्थ काय आहे हे स्पष्ट केले पाहिजे. 
      या ग्रंथानंतर लगेचच अमेरिकेत आर्थर हॅडली (१८५६-१९३०) या अर्थशास्त्रज्ञ तत्त्ववेत्त्याच्या, १९०७ सालच्या 'सार्वजनिक नीतीची पातळी'(The Standards of Public Morality) या ग्रंथाने उपयोजित नीतिशास्त्राचा पाया रचला. त्याने नतिक जीवनाचा विचार करताना व्यक्तीचे खासगी जीवन आणि सार्वजनिक जीवन यात फरक केला पाहिजे, त्यानुसार नतिक निकष बनविले पाहिजेत, असा सिद्धांत त्याने मांडला. १९७०च्या दशकात या उपयोजित नीतिशास्त्राला निश्चित आकार आला तो पीटर सिंगर (१९४६-) या तत्त्ववेत्त्याच्या 'अप्लाइड एथिक्स' (१९८६) या ग्रंथाने.
      दुसऱ्या महायुद्धाने युद्ध, आंतरराष्ट्रीय संबंध, नववसाहतवाद, रासायनिक-आण्विक प्रकल्प आदी प्रश्नांना वाचा फोडली. या नीतिशास्त्राने जैववैद्यकीय नीतिशास्त्र, व्यावसायिक नीतिशास्त्र आणि पर्यावरण नीतिशास्त्र या नव्या तीन ज्ञानशाखांना जन्म दिला. गर्भपात, दयामरण, फाशी, आत्महत्या, कामसंबंध, विवाह, युद्ध, माहिती तंत्रज्ञान, संगणक, राजकारण, समाजकारण, प्राणिमुक्ती आंदोलन, मोठय़ा धरणाचे महाप्रकल्प, कामगार संघटना, रासायनिक-आण्विक प्रकल्प, तसेच वकिली, डॉक्टरी, पोलीस-लष्करी, सनदी सेवा, शिक्षण, मुख्य म्हणजे राजकारण ही सारी क्षेत्रे ही राष्ट्रसेवा की धंदा? जागल्या (व्हिसल ब्लोअर) का हवा, हे प्रश्न जास्त उग्र झाले. हे प्रश्न शुद्ध चारित्र्य, सद्हेतू, सदसद्विवेकबुद्धी, परोपकार, आत्मबुद्धी इत्यादींनी सोडविता येत नाहीत, हे उघडच आहे. त्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व नीतीचे अभ्यासक, व्यावसायिक तत्त्ववेत्ते, तत्त्ववेत्ते यांच्या एकत्रित सहकार्याने सोडवावे लागतील, अशी जाणीव या नीतिशाखेने दिली. नीतिशास्त्र अशा तऱ्हेने 'आंतरविद्याशाखीय ज्ञानशाखा' बनले. यातून माध्यमांचे, उद्योगसमूहाचे, व्यवस्थापनाचे नीतिशास्त्र निर्माण झाले. अशा सगळ्यांना मिळून उपयोजित नीतिशास्त्र म्हटले जाते. तेच आज मूलभूत चिंतनक्षेत्र ठरले आहे, कारण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राचे व्यावसायिकीकरण झाले आहे.


Wednesday 2 July 2014

तत्त्वभान २७ तर्कशास्त्र : विचारांच्या नियमांचे शास्त्र ०३ जुलै २०१४

तर्कशास्त्र : विचारांच्या नियमांचे शास्त्र
श्रीनिवास हेमाडे 
आजच्या विविध ज्ञानशाखांचा विस्तार पाहिल्यावर, विचारांत सुसंगती आणून केलेली ज्ञाननिर्मिती हे साध्य मानण्याची पाश्चात्त्य परंपरा आज अंगी बाणवण्याची गरज पटू लागावी.. तर्कशास्त्राचे उचित महत्त्व जाणून ते भारतीय परंपरांना लावून पाहिले, तर काय दिसेल?
           माणूस हा विचार करणारा प्राणी आहे, (मॅन इज रॅशनल अ‍ॅनिमल) ही व्याख्या अ‍ॅरिस्टॉटलने दिली असा एक समज आहे. अ‍ॅरिस्टॉटलचे मूळ शब्द zoon logikon असे आहेत. zoon हा शब्द zoo पासून बनतो. Logikon चा अर्थ 'विचारशील' असा होतो की नाही, हे निश्चित नाही. कारण logikon या संकल्पनेत मन, आत्मा, विश्वातील सुव्यवस्था राखणारी नियंत्रक शक्ती, वैश्विक बुद्धी इत्यादी अर्थ सामावलेले आहेत. अ‍ॅरिस्टॉटलच्या मते माणसाकडे अशी एक बौद्धिक शक्ती किंवा तत्त्वे आहेत की ज्यांच्या साह्य़ाने माणूस जीवनात सुसंगत प्रकल्प राबवितो. या logikon ची सुव्यवस्थित रचना ते Logic.
          इंग्लिशमधील लॉजिक या शब्दाचे भाषांतर म्हणून भारतीय भाषांमध्ये तर्कशास्त्र हा शब्द वापरला जातो. लॉजिक या अर्थाचा प्रत्यय लागूनच बायॉलॉजी, अँथ्रपॉलॉजी, सोश्ॉलॉजी, सायकॉलॉजी, अ‍ॅस्ट्रॉलॉजी, फिलॉलॉजी, मॉर्फोलॉजी असे नवे शब्द किंवा विषयांची नावे बनतात. प्रत्येक ज्ञानशाखा आपले 'लॉजिक' विकसित करूनच आपला संसार करते. तर्कशास्त्र ही तत्त्वज्ञानाची मुख्य शाखा आहे.
         विचार करणे ही कृती म्हणजे जग आणि जगाचे विविध घटक, घटना, नियम, त्यांचा परस्परसंबंध समजावून घेणे असते. पण बेशिस्त विचार म्हणजे विचार नव्हे. विचार करणे, विचारांचे नियम पाळून सत्य व युक्त विचार करणे, योग्य निष्कर्षांला येणे; ही बाब निश्चित कृतीसाठी आवश्यक असते. त्या वेळी विचार कसा करावा, हाच एक विचार होतो आणि त्याचाही विचार करावा लागतो. अशा विचारांच्या नियमांचे शास्त्र म्हणजे तर्कशास्त्र.
         तर्काचे साधे नाव अंदाज किंवा अनुमान. कौटुंबिक, सामाजिक व राजकीय घडामोडी किंवा सूर्यग्रहण, हवामान, पाऊसपाणी, दुष्काळ या नसíगक घटनांचे अंदाज आणि महागाई, बाजार, गुन्हेगारी इत्यादी त्यास जोडले गेलेले इतर घटक याविषयी अंदाज व्यक्त केले जातात, पण प्रत्येक अंदाज हा योग्य तर्क असतो, असे नाही. तर्काला वास्तवाचा, सत्य घटनांचा आधार असतो. अंदाज व्यक्तिगत भावना, इच्छा, वासना यांनी प्रभावित असतो. तर्क शास्त्रीय असतो; तर अंदाज भावनिक, अशास्त्रीय असतो.
         तर्कशास्त्र हे सत्य आणि युक्त अनुमानांची रचना करणारे शास्त्र असते. साधारणत: अनुमानात काही विधाने सत्य म्हणून स्वीकारलेली असतात किंवा तात्पुरती सत्य मानलेली असतात आणि त्यांच्यापासून इतर काही विधाने निष्पन्न केली जातात. सत्य म्हणून स्वीकारलेल्या विधानांना आधारविधाने म्हणतात आणि आधारविधानांपासून निष्पन्न केलेल्या विधानास निष्कर्ष म्हणतात. अनुमानाचे काही नियम असतात. त्या नियमांचा भंग झाला, तर त्याला 'तर्कदोष' म्हणतात. तर्कदोष करावयाचे नसतात आणि करू द्यावयाचे नसतात. तर्कशास्त्रात अनुमानांच्या वेगवेगळ्या प्रकारांचे वर्गीकरण करून त्यांच्या स्वरूपाचे विश्लेषण करण्यात येते आणि ही वेगवेगळ्या प्रकारची अनुमाने प्रमाण कधी असतात, प्रामाण्याच्या अटी कोणत्या याची चिकित्सा करण्यात येते.
       तर्कशास्त्राचे साधारणत: तीन प्रकार करता येतात. अ‍ॅरिस्टॉटलचे तर्कशास्त्र, मध्ययुगातील लॉर्ड फ्रान्सिस बेकनचे (१५६२-१६२६) नवे तर्कशास्त्र आणि एकोणिसाव्या शतकातील आधुनिक किंवा आकारिक तर्कशास्त्र. बेकनच्या तर्कशास्त्राने विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतीला जन्म दिला. आधुनिक आकारिक तर्कशास्त्रात प्रामुख्याने गणितात वापरण्यात येणाऱ्या अनुमानांचे विश्लेषण केले जाते. चिन्हांचाही सढळ वापर करण्यात येतो. त्यास 'गणिती तर्कशास्त्र' किंवा 'चिन्हांकित तर्कशास्त्र' म्हटले जाते. या नव्या तर्कशास्त्राच्या तुलनेत अ‍ॅरिस्टॉटलच्या तर्कशास्त्राला पारंपरिक तर्कशास्त्र असे नाव दिले गेले. हे सगळे पाश्चात्त्य तर्कशास्त्र आहे. इंग्रजी विद्य्ोचा एक भाग म्हणून पाश्चात्त्य तर्कशास्त्राचा प्रवेश भारतीय शिक्षणव्यवस्थेत विसाव्या शतकात झाला. 
      प्राचीन भारतातही असे अनुमानाचे तर्कशास्त्र विकसित झाले. त्यास अनुमानशास्त्र असे नाव आहे. ते मुख्यत: न्यायदर्शन या वैदिक प्रणालीने मांडले. यात अनुमानांचे स्वरूप, प्रकार व प्रामाण्य यांविषयी सूक्ष्म विचार झाला आहे. अक्षपाद गौतमाने (सु. दुसरे शतक) न्यायसूत्रे लिहिली, असे समजले जाते. इ. स. पू. पाचव्या शतकापासून तो इ. स. पू. तिसऱ्या शतकापर्यंतच्या कालखंडात ती रचली गेली असावीत, असे मानले जाते. न्यायसूत्रांत सोळा विषयांचे म्हणजे पदार्थाचे विवेचन केले आहे. प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंडा, हेत्वाभास, छल, जाती व निग्रहस्थान. या पदार्थाचे तत्त्वज्ञान झाल्याने नि:श्रेयस प्राप्त होते, असे म्हटले आहे. न्यायदर्शनाला युक्तिवादाचे शास्त्र म्हणजे न्यायविद्या, हेतुविद्या किंवा न्यायशास्त्र अशीही नावे आहेत. तथापि केवळ न्यायदर्शन म्हणजे भारतीय तर्कशास्त्र असे समजणे चूक आहे. भारतीय तर्कशास्त्रात अवैदिक बौद्ध दर्शन आणि जैन दर्शनातील अनुमान विचाराचाही समावेश होतो. पण वैदिक विचारांचा प्रभाव व दबाव इतका जोमदार होता की केवळ वैदिक न्यायदर्शनाला भारतीय तर्कशास्त्र हा दर्जा प्राप्त झाला. प्राचीन भारतात व्याकरण आणि न्यायशास्त्राचे अध्ययन जवळपास सक्तीचे होते.
      भारतात स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय तत्त्वज्ञानाचा स्वतंत्र अभ्यास सुरू झाला त्या वेळी भारतीय तर्कशास्त्राची जाणीव अभ्यासकांना झाली. आज जागतिक स्तरावर भारतीय तर्कशास्त्राचा जोमाने, अतिशय चिकित्सक, काटेकोर आणि सखोल अभ्यास चालू आहे.
       पण प्राचीन काळापासून भारतीय विचारविश्वाची शोकांतिका अशी की भारतात विचार करणे, ज्ञान निर्माण करणे हे 'साध्य' मानले गेले नाही. ते 'साधन' मानले गेले. अद्वैत वेदान्त आणि मोक्ष हेच भारतीय तात्त्विक विचारविश्वाच्या अग्रभागी राहिले. तर्क करणे, हा बुद्धिभेद समजला गेला. तर्काला प्रतिष्ठा दिली गेली नाही. महाभारतातील यक्षप्रश्न-नाटय़ात यक्ष धर्मराज युधिष्ठिराला प्रश्न विचारतो 'क: पन्था:?' कोणता मार्ग अनुसरावा? धर्मराज उत्तर देतो - 

तर्क: अप्रतिष्ठ: श्रुतय: विभिन्ना:।
न एक: मुनि: यस्य मतं प्रमाणम् ।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम् ।
महाजन: येन गत: स: पन्था:?

         याचा अर्थ तर्काला प्रतिष्ठा नसते.. आदरणीय लोक ज्या मार्गाने जातात, त्याच मार्गाने जावे. या प्रश्नात ज्ञानाचे साधन असलेला तर्क बाजूलाच राहिला आणि धर्म गूढ बनला. रामायण, महाभारतातसुद्धा तर्काची िनदा आढळते. मनुस्मृतीनुसार जो तर्क करतो त्याला स्वर्गप्राप्ती होत नाही. म्हणून जो तर्काचा आश्रय करेल त्याला बहिष्कृत करावे. 'गंधर्वतंत्र' या ग्रंथानुसार तर न्यायशास्त्राचे अध्ययन करणाऱ्यास शृगालयोनी (कोल्हा) प्राप्त होते. 
      आज, न्यायदर्शनाचा अभ्यास करणे, हे आव्हान मानले पाहिजे. न्यायशास्त्र हे वादविद्य्ोचे कुंपण आहे, त्यात सहजासहजी प्रवेश मिळणार नाही, असे न्यायदर्शनाचे वर्णन केले जाते. काही प्रश्न उपस्थित करता येतील. पाश्चात्त्य तर्कशास्त्राने जसे विज्ञान व वैज्ञानिक पद्धती निर्माण केली तशी भारतीय तर्कशास्त्राने केली का? न्यायदर्शनातील 'जाती' ही संकल्पना आणि प्रत्यक्षातील जातिव्यवस्था यांचा काही संबंध आहे का? उदाहरणार्थ, न्यायदर्शनाच्या मते, जाती हा पदार्थ आहे. जाती संख्येने नेहमी एकच असते आणि नेहमी अक्षय्य असते. न्यायदर्शनाची 'जाती' ही संकल्पना प्रत्यक्षातील जातिव्यवस्थेतील जातीस लागू करता येते का? न्यायदर्शनाच्या 'जाती' व्यवस्थेकडे एक प्रारूप म्हणून पाहिले आणि त्याचे उपयोजन प्रत्यक्ष जातिव्यवस्थेशी जोडून पाहिले तर कोणते चित्र मिळेल? कशी मांडणी करता येईल? जाती संकल्पना प्रत्यक्षातील जातिव्यवस्थेच्या रचनेचे आणि तिच्या अविनाशीत्वामागील 'छुपे तर्कशास्त्र' मानता येईल काय? आज भारतीय प्रबोधनाचे नवे प्रश्न आणि आंबेडकरवादाचा विस्तार या अर्थाने विचारता येईल.