Friday 27 June 2014

तत्त्वभान २६ सत्ताशास्त्र ... सत्य म्हणजे ? २६ जून २०१४

सत्ताशास्त्र ... सत्य म्हणजे ? 

श्रीनिवास हेमाडे

विस्मयचकित करणारे विश्वसाहित्याचा भाग बनलेले, अज्ञेयवादी सत्ताशास्त्रीय विचार व्यक्त करणारे 'नासदीय सूक्त' (ऋग्वेद) ज्या भारतात निर्माण झाले; तिथे शिष्याच्या पात्रतेच्या गाळणीमुळे पुरुषसूक्तातील वर्णव्यवस्थेची अवैज्ञानिक उत्पत्ति स्पष्ट करणारे श्लोक हेच सामाजिक सत्य मानले गेले. आणि येथे वर्णजातलिंग हे उपमुद्दे महत्वाचे ठरले.

       "मग सांग तर, सत्य म्हणजे काय ?" पायलेटने प्रश्न विचारला आणि उत्तरासाठी तो प्रभूपुत्र येशूकडे पाहू लागला. येशू नि:शब्द.हा प्रसंग आहे येशूच्या शिक्षेचा. न्यायनिवाडा करतो तो तत्कालीन रोमन सम्राट टीबेरियस याचा सुभेदार पाँटीअस पायलेट. येशूने दिलेल्या उत्तरावर त्याने केवळ खांदे उडवून येशूचा आणि त्याच्या उत्तराचा उपहास केला. पायलेटचा प्रश्न तात्त्विक असून त्याचे वैशिष्ट्य हे की एका धुरंधर शासकाने तो उपस्थित केला. कुठलाही राजकारणी अशा तऱ्हेचा तात्त्विक प्रश्न; तोही थेट सत्याविषयी कधी उपस्थित करीत नसतो. 
         सत्य म्हणजे जे आहे, असतेच, "जे नाही, असे म्हणता येत नाही" असे. सत्याचे असणे म्हणजे सत्तावत्, सत्तावान असणे. 'सत्' पासून 'सत्ता' शब्द होतो. म्हणून सत्य हीच सत्ता. अस्तित्व हा सत्य या शब्दाचा समांतर शब्द मानला गेला. या सत्तेच्या ज्ञानाची सुव्यस्थित रचना करणे, याचा अर्थ सत्ताशास्त्र रचणे.पाश्चात्य परंपरेत सत्ताशास्त्राला Metaphysics (मेटॅफिजिक्स) अशी संज्ञा आहे. ती ऱ्होडचा अँड्रोनिकस (इ.स.पू.६०) या पंडित ग्रंथपालाने प्रचारात आणली. स्वतः ॲरिस्टॉटल मेटॅफिजिक्सचा उल्लेख 'आदितत्त्वज्ञान' (The First Philosophy), 'प्रज्ञान' (Wisdom), ईश्वरविद्या असा करतो. 
       Metaphysics या इंग्रजी शब्दाचे मराठी भाषांतर म्हणून संस्कृत, मराठी व इतर भारतीय भाषांमध्ये अतिभौतिकी, अस्तित्वशास्त्र, तत्त्वमीमांसा, अध्यात्मशास्त्र, सत्ताशास्त्र, सद्वस्तूशास्त्र या संज्ञा मराठीत उपयोगात आणल्या जातात. यातील अध्यात्म आणि अध्यात्मशास्त्र या विषयी भारतीय मनाचे बरेच स्वतंत्र समज-गैरसमज आहेत. 
        सत्ताशास्त्र ज्यांना सत्य मानते ते दोन प्रकारचे आहे. पहिला प्रकार हा निसर्ग नियम आणि सामाजिक नियमरुपी तत्त्वांचा आहे. दुसरा प्रकार जग, माणूस आणि त्यांचा परस्पर संबंध यांचा आणि त्या संबंधातून व्यक्त होणाऱ्या, पण निसर्गाचा व समाजाचा घटक नसणाऱ्या तत्त्वांचा आहे. त्यांना परतत्त्वे म्हणता येईल. ही सारी तत्त्वे म्हणजे अमूर्त संकल्पना असतात. या सर्वांचा अभ्यास, चिकित्सा हा सत्ताशास्त्राचा विषय आहे. सत्ताशास्त्र तीन सत्ता स्वीकारते: (१) अनुभवास येणारे जग आणि माणसासह सर्व प्राणिजात (२) अमूर्त संकल्पना आणि (३) परतत्त्वे. या तत्त्वांना मान्यता दिली, त्यांचे अस्तित्व स्वीकारले किंवा नाकारले तर काय होईल ? या संकल्पनांना, परतत्त्वांना खरेच अस्तित्व आहे काय? त्यांच्या असण्या-नसण्याचा समाजावर परिणाम काय होईल ? यांचा अभ्यास सत्ताशास्त्र करू पाहते आणि निष्कर्ष मांडते. 
       अनुभवास येणारे जग निसर्ग नियमाने चालते. ते नियम म्हणजे काही मुलभूत भौतिकतत्त्वे असतात. त्यांना गृहीत धरले तरच निसर्ग अभ्यासता येतो, विज्ञान शक्य होते. उदाहरणार्थ, निसर्गात कार्यकारणसंबंध असतो; असे पदार्थ विज्ञान गृहीत धरते. प्रत्येक विज्ञानाची अशी गृहीतकृत्ये असतात आणि त्याप्रमाणे आपल्या विषयाचे वर्णन करण्यासाठी त्यांचा उपयोग ते करीत असते. किंबहुना त्यांचा उपयोग केल्याशिवाय कशाचेही वर्णन करणे, त्याच्याविषयी विधाने करणे अशक्य असते. अशा मूलभूत संकल्पना म्हणजे 'वस्तु' किंवा 'सत्', 'वस्तूप्रकार', 'द्रव्य-गुण', 'कार्यकारणभाव, 'संबंध', 'अवकाश' किंवा 'दिशा', 'काल', 'संख्या' इत्यादी. व्यवहारातील विधाने व वैज्ञानिक विधाने यांना आधारभूत असलेल्या या संकल्पनांचे विश्लेषण करणे, त्यांचे आशय, परस्परसंबंध स्पष्ट करणे हे काम कोणतेही विशिष्ट विज्ञान करीत नाही. जसे की 'कार्यकारणसंबंध सत्य आहे काय?' किंवा 'कार्यकारणसंबंध सत्य आहे असे मानायला काय आधार आहे?' असे प्रश्न विज्ञान उपस्थित करीत नाही. हे प्रश्न त्या विज्ञानातील प्रश्न नसतात, तर त्या विज्ञानाविषयीचे प्रश्न असतात. पण स्वतः ते विज्ञान हे प्रश्न सोडवीत नाही. पण ते सोडविले, त्यांची चर्चा, चिकित्सा केली तरच विज्ञान शक्य होते. तेंव्हा अशा सर्व विशिष्ट विज्ञानांना आणि ज्ञानशाखांना आधारभूत असलेल्या गृहीतकृत्यांची चिकित्सा करणारे शास्त्र म्हणजे तत्त्वमीमांसा. 
       आता, समाज जीवन जगताना माणूस समाज, राज्य, कुटुंब, प्रेम, ज्ञान, आदर्श इत्यादी आणि स्व/ आत्म, (Self), मन, आत्मा (Soul), चैतन्य (Spirit) या संकल्पना वापरतो. विश्वाबद्दल विचार करताना अस्तित्व म्हणजे काय ? त्याचे मुलभूत घटक कोणते आणि त्याचे गुणधर्म कोणते ? हे प्रश्न विचारतो. माणसाचे विश्वाशी काय नाते आहे, हे शोधताना आणि भौतिक जगात कार्यकारण संबंध आढळल्याने या विश्वाचे कारण म्हणून तो धर्म, ईश्वर, परमात्मा, अंतिम सत्य (Ultimate Reality)अशा संकल्पना निर्माण करतो. या साऱ्या संकल्पनांना तो 'सत्य (Real) समजतो. 
      ही तत्त्वे स्वीकारली की चिद्वाद, नाकारली की जडवाद आणि तटस्थ राहिले की अज्ञेयवाद या विचारसरणी निर्माण होतात. ईश्वरवाद, निरीश्वरवाद यातूनच येतात. ईश्वर मानला की मग तो पुरुष की स्त्री की निर्लिंग की उभयलिंग किं बहुलिंगीय ? हे प्रश्न आलेच. सत्ताशास्त्र केवळ अस्तिकांचेच असते असे नव्हे, तर तुम्ही नास्तिक असला तरी तुम्हाला तुमचे नास्तिक सत्ताशास्त्र निर्माण करावे लागते. जसे की, लोकायतांनी इहलोकाचे सत्ताशास्त्र मांडले, हे लक्षात घेतले पाहिजे. 
     सत्य म्हणजे काय ? हा प्रश्न आणि सामाजिक न्याय-अन्याय, शोषण, विषमता यांचा संबंध काय ? असा प्रश्न विचारू. त्याचे इतिहास देतो ते उत्तर असे : परत्त्वांचे ज्ञान ही सर्व समाजाचा हक्क नाही, तो केवळ पात्र शिष्यांना लाभणारा दुर्मिळ हक्क आहे. हे सर्व संस्कृती मान्य करतात आणि येथून विषमतेची बीजे पेरली जातात. भारतात हे अधिक ठळकपणे, जोमदारपणे आणि निर्दयतेने मांडले गेले. वैदिक सत्य म्हणजे केवल ब्रह्म. या ब्रह्मसत्याचे मुख सुवर्णपात्राने झाकलेले आहे, (हिरण्यमये पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् – ईशोपनिषद १५.) ही संकल्पना शिष्याच्या पात्रतेचा मुद्दा उपस्थित करते. 
      उपनिषद या संज्ञेचा अर्थ "गुरूच्या सान्निध्यात खासगी बैठकीत केलेला गुप्त उपदेश' असा आहे. उपनिषद ग्रंथांमधील उपदेश गुप्त मानल्यामुळे अनधिकारी व्यक्तींकडून त्याचा विपरीत अर्थ लावला जाईल किंवा त्याचा दुरुपयोग होईल म्हणून त्यांच्यापर्यंत तो जाऊ नये, याबाबत विशेष दक्षत घेतली गेली. कठोपनिषदात नचिकेतसच्या बुद्धीची शुद्धता आणि सामर्थ्य यांची कसोटी घेतल्यानंतरच यम त्याच्या प्रश्नाचे उत्तर देतो. साहजिकच तिथे पात्रतेचा मुद्दा, निकष लागू झाला. पात्रापात्रतेचा विचार न करता सर्वांना अंतिम सत्याचे ध्यान देण्याची अनिच्छा केवळ भारतातच होती, असे नाही तर ती सर्वच प्राचीन मानवांमध्ये होती. उदाहरणार्थ "ज्यांना सोने हवे असेल त्यांनी त्यासाठी खणण्याचे श्रम केले पाहिजेत, नाहीपेक्षा त्यांनी तृणांवरच समाधान मानले पाहिजे" असे प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता हेराक्लीटस म्हणतो, असे असे एम. हिरीयण्णा हे तत्त्ववेत्ते नमूद करतात. 
     चार्वाकांचा वगळता सर्व दर्शनांच्या अध्यात्मशास्त्रांनी शोषणाचा पाया रचला. ब्रह्म सत्य असो वा नसो पण भौतिक जगाचे ज्ञान सुद्धा मक्तेदारी बनली. परिणामी आजच्या राजकारणाला 'केवल धर्म-वर्णजातीयवादाचे स्वरूप' लाभले, हेच सत्य समोर उभे ठाकलेले आहे. "सत्य मेव जयते नानृतम / सत्येन पन्था विततो देवयानः" या वचनातील 'सत्य', क्रूसस्थ येशुप्रमाणे केवळ अशोक स्तंभाचे मानकरी ठरले आहे ! 


















Wednesday 18 June 2014

तत्त्वभान २५ ज्ञानशास्त्र ... नवे आव्हान १९ जून २०१४



ज्ञानशास्त्र ... नवे आव्हान

श्रीनिवास हेमाडे
अर्नेस्ट सोसा १९४० 
ज्ञान कशासाठी? याचे उत्तर 'र्सवकष प्रबोधनासाठी!' असे असले पाहिजे. भारतात अद्यापि प्रबोधनाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने प्रबोधनाकडे नेणारे नवे ज्ञानशास्त्र रचले गेले पाहिजे. ज्ञान व माहिती यात नेमका विवेक करून ज्ञानाचे प्रेम विकसित करणाऱ्या शिक्षण क्षेत्राची रचना करणे गरजेचे आहे.
        ज्ञान म्हणजे काय? हा प्रश्न प्राचीन भारतीय आणि प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी उपस्थित केला आणि विविध सिद्धांत मांडले. त्यांचा स्वतंत्र अभ्यास सखोलपणे करता येतो. मानवी ज्ञानाचे स्वरूप, त्याची व्याप्ती, त्याला असलेल्या मर्यादा, प्रामाण्याचे निकष, ज्ञानाचा आणि समग्र अस्तित्वाचा संबंध या प्रश्नांचा विचार तत्त्वज्ञानाच्या ज्ञानशास्त्र या शाखेत केला जातो. ज्ञानाची साधने कोणती, ज्ञानाचे स्वरूप काय? ज्ञानाचा निकष कोणता? यथार्थ आणि अयथार्थ ज्ञानातील नेमका फरक काय? पुढे जाऊन 'आपण जाणतो हे कसे जाणतो? म्हणजे एखाद्या गोष्टीचे ज्ञान होते, याचे ज्ञान कसे होते?' याचा विचार ज्ञानशास्त्रात होतो. ज्ञान ही मानवी संकल्पना असली तरी ती ईश्वरालाही लागू केली जाते. ईश्वर परम प्रज्ञानी मानला जातो. अर्थात हीसुद्धा मानवी धारणा असते.
         ज्ञानशास्त्र ही ज्ञानविषयक समस्यांचा अभ्यास करणारी तत्त्वज्ञानाची एक शाखा आहे. इंग्लिशमधील एपिस्टेमॉलॉजी (Epistemology) या संज्ञेचे भाषांतर म्हणून ज्ञानशास्त्र ही संज्ञा उपयोगात आणली जाते. एपिस्टेमॉलॉजी ही संज्ञा जेम्स फेरिएर (१८०८-१८६४) या स्कॉटिश तत्त्ववेत्त्याने प्रथम सुव्यवस्थितपणे प्रचारात आणली. ग्रीक भाषेतीली episteme म्हणजे ज्ञान आणि 'logos म्हणजे शास्त्र. म्हणून Epistemology चा अर्थ ज्ञानशास्त्र. 
        प्राथमिक पातळीवर ज्ञानशास्त्र, मानवी ज्ञानाचे वर्णन आणि मूल्यमापन करताना ज्ञान, भ्रम, प्रत्यक्ष ज्ञान, अनुमान, प्रतीती, विधान, सत्य इत्यादी संकल्पनांचे विश्लेषण करते. त्याचप्रमाणे या संकल्पनांचा आशय स्पष्ट करणे, त्यांचा परस्परसंबंध निश्चित करणे हे कार्य करते. दुसऱ्या पातळीवर विविध विज्ञानांचे स्वरूप, त्यांची ज्ञानविषयक उद्दिष्टे आणि विषय यांनुसार त्या त्या विज्ञानाची पद्धती आणि एकूण विज्ञान या ज्ञानरचनेची सामान्य पद्धती, तिचे प्रामाण्याचे निकष निश्चित करणे, हे काम करते. तिसरे म्हणजे, एखाद्या प्रस्थापित विज्ञानाच्या पद्धती व उद्दिष्टात गरजेनुसार बदल करणे, आणि वेगवेगळ्या विज्ञानांची गृहीतकृत्ये, त्यांच्या पद्धतीचा आधार असलेल्या मूलभूत संकल्पनांचा परस्परसंबंध स्पष्ट करून त्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणे, हेही काम ज्ञानशास्त्र करते. त्यामुळे विविध विज्ञानांची एक सुसंगत व्यवस्था लागते. साहजिकच विज्ञान म्हणजे सुव्यवस्थित ज्ञान, अशी व्याख्या शक्य होते. 
          'ज्ञान' या संकल्पनेचा अभ्यास का करावयाचा? नाही केला तर काय बिघडते? आता पाहा, 'जाणणे' आणि मत, विश्वास, श्रद्धा, समज होणे आणि अंदाज, ठोकताळे यांतील नेमका फरक स्पष्ट करण्याची क्षमता माणसात निर्माण होणे हा कळीचा मुद्दा असतो. वैज्ञानिकांचे निष्कर्ष, वैद्यांचे उपचार, न्यायालयीन कामकाज व अंतिम निर्णय या आणि यांसारख्या सर्व गोष्टी वस्तुस्थितीच्या 'ज्ञानावर' अवलंबून असतात, ठोकताळ्यांवर नाही. त्यासाठी 'ज्ञान' या संकल्पनेची तपासणी करणे गरजेचे ठरते.
          सामाजिक अर्थाने पाहता, आपण जे काही करीत असतो, त्याचे समर्थन कशाच्या आधारे करतो आणि मानवी अनुभव व दृश्य जग याबाबतची सत्ये शोधताना आपण कोणते निकष पुरावे म्हणून स्वीकारले पाहिजेत, यांचा शोध घेणे आवश्यक असते, तो ज्ञानशास्त्रात घेतला जातो. सामाजिकदृष्टय़ा 'ज्ञान होणे' याचेच ज्ञान होणे, हे सुसह्य़ जगण्यासाठी गरजेचे असते. 
ज्ञान म्हणजे काय? हा प्रश्न उपस्थित केला गेला तो प्रथम ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो याने. त्याला सामाजिक व राजकीय आशय लाभला तो आधुनिक प्रबोधन काळात. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे माणसाच्या विवेकशक्तीच्या स्वातंत्र्याची घोषणा आणि त्या शक्तीस दिलेले साक्षात उत्तेजन. 
      आता, विवेकशक्तीचे स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? इमान्युएल कांट (१७२४-१८०४) हा गेल्या सहस्रकातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ त्याच्या 'व्हॉट इज एनलायटन्मेंट' (प्रबोधन म्हणजे काय?) या निबंधात म्हणतो की, माणूस विविध दबावांमुळे आपल्या आकलन-सामर्थ्यांचा उपयोग करण्याची पात्रता आणि धर्य गमावून बसतो. पण प्रबोधन हा माणसाच्या विवेकशक्तीचा उद्भव आहे. म्हणूनच कान्टच्या मते, 'स्वत:ची विवेकबुद्धी वापरण्याचे धर्य निर्माण करा!' हीच प्रबोधनाची घोषणा बनते. ही भूमिका मूलत: सॉक्रेटिसने, त्यानंतर होरास (इ.स.पू. ६५-०८) या रोमन कवी तत्त्ववेत्त्याने 'ज्ञान मिळविण्याचे धर्य निर्माण करा' अशा घोषणेतून मांडली. तिचा पुनरुच्चार करून कान्टने तिला प्रबोधनाचे सूत्र हा दर्जा दिला. 
          विसाव्या शतकात पारंपरिक ज्ञानशास्त्राच्या रचनेवर स्त्रीवाद्यांनी आक्षेप घेतला आणि नव्या स्त्रीवादी ज्ञानशास्त्राची संकल्पना पुढे आली. नंतर अन्रेस्ट सोसा (१९४०) या विद्यमान अमेरिकन तत्त्ववेत्ता आणि आघाडीच्या ज्ञानशास्त्रज्ञाने 'सद्गुण दृष्टिकोनवादी ज्ञानशास्त्र' मांडले. यानुसार बौद्धिक सद्गुणांचे ज्ञान हेच खरे ज्ञान. उदाहरणार्थ, कुतूहल, नम्रता, सेवाभाव, मनाचा खुलेपणा, रास्त असण्याचा मनाचा कल, बौद्धिक खंबीरता आणि धर्य. या मांडणीचा पुढे विकास केला तो लिंडा झागजेबस्की (१९४६-) आणि लॉरेन कोड (१९३७-) या अमेरिकन स्त्रीवादी ज्ञानशास्त्रज्ञ विदुषींनी. 
      भारतीय ज्ञानशास्त्र विस्मयकारकरीत्या अत्यंत समृद्ध आहे; पण ते वर्ण-जाती-लिंगभेदात अडकले. भारतात ज्ञानासाठी ज्ञान ही मांडणी कधीही झाली नाही. अपरा-परा विद्या हा भेद स्पष्ट होता. मोक्ष हाच ज्ञानाचा एकमेव उद्देश बनला. ज्ञान आणि मोक्ष दोन्ही खासगी बनले. ज्ञान हा सामाजिक व्यवहार बनला नाही. ज्ञानबंदी हाच मुख्य व्यवहार होता. साहजिकच समाजाला शहाणे करण्याचे कारण उरत नाही. 
परिणामी - 
(१) आज भारतात ज्ञानाला महत्त्वच नसल्याने प्रत्यक्ष जगण्यात ज्ञानी माणसाचे महत्त्व शून्य आहे. 
(२) भारतीय शिक्षणव्यवस्था आणि शिक्षण संस्था ज्ञान देण्याऐवजी माहिती देणारी 'पोपटनिर्माण मॉल्स' बनली. 
(३) शुद्ध तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ज्या व्यक्ती किंवा विचारधारा ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात त्यांना येनकेनप्रकारेण शरणागती पत्करायला लावून त्यांच्या मानगुटीवर परतत्त्वाचे भूत बसविले जाते. न्याय-सांख्य, योग-वैशेषिक यांच्याबाबतीत असे दिसते.
(४) माहिती आणि ज्ञान यांतील फरकाचेच ज्ञान नसल्याने समाजात ज्ञानाबद्दलची आसक्ती वाढू शकत नाही. 
(५) ज्ञान व ज्ञानी माणसाला मूल्यच नसल्याने भारतीय प्रबोधन अपुरे राहिले आहे..
..आणखी बरेच काही..! 
          दुसरीकडे समाज शहाणा व्हावा, ही संत ज्ञानेश्वर ते गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांची परंपरा ही सामाजिक व राजकीय ज्ञानातून लाभणाऱ्या शहाणपणाची गोष्ट आहे. पण संतांचेही लोक ऐकत नाहीत, हे सिद्ध झाले आहे. अन्यथा 'वारकऱ्यांची यादवी' लिहिण्याची वेळ आली नसती. आणि संतांचे वंशज असल्याचा दावा करणाऱ्यांकडून संतटीकेवर बंदी घालण्याची अवैज्ञानिक मागणी झाली नसती. ज्यांनी वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचा उदय भारतात कसा होईल, हे पाहिले पाहिजे; त्यांनी विज्ञान, वैज्ञानिक दृष्टी कशी मरेल, संतांचे सामाजिक प्रबोधन कसे रसातळाला जाईल, याकडे लक्ष द्यावे, हे भारतीय जनतेचे केवळ दुर्दैव आहे. नव्हे, हा तर कलियुगीन महिमा म्हणावा, असा वैदिक नियतीवादी सटवाईचा लेख म्हणावा लागेल. 
      म्हणूनच ज्ञानाला मूल्य देणारे नवे इहवादी ज्ञानशास्त्र रचणे आणि त्यावर आधारित शिक्षणव्यवस्था अमलात आणणे हा नवप्रबोधनाचा अजेंडा असला पाहिजे.

      तुकोबांचा 'बुडती हे जन न देखावे डोळा' हा अनंत कारुण्यभाव हे त्याचे अधिष्ठान असावे.


Friday 13 June 2014

तत्त्वभान १५ मतदात्यांचा मोक्ष




श्रीनिवास हेमाडे 

salvation of voters
आत्मदर्शनाची तळमळ आणि त्यासाठी गीतेतील कर्तव्यकठोरता आचरणात आणण्याची तयारी हे गुण मतदारांमध्ये असतील, तर नागरिकांकडे आधी स्पष्ट मते असतील आणि निवडणुकांचा अर्थ अशा मतांचे दान एवढाच असेल..

        तत्त्वज्ञान किंवा दर्शन कोणतेही असले, कोणत्याही देशात, कोणत्याही काळात विकसित झालेले असले तरी 'जग आणि माणूस समजावून घेणे' ही सर्वसमावेशक व्यापक भूमिका प्रत्येक तत्त्वज्ञानामागे असते. माणूस जिवंत असताना त्या त्या काळातील विद्यमान जगाची रचना, त्याचे स्वरूप आणि पुढील अपेक्षित विकासाची दिशा समजावून घेणे, हा त्या त्या काळातील राजकीय व सामाजिक कार्यक्रम असतो. 
       'मत' म्हणजे केवळ शिक्का मारणे किंवा बटन दाबणे (व्होट) नसते. 'मतदान' ही कृती राज्यकर्ता निवडण्याचे नागरिकाचे आकलन कसे आहे, उमेदवाराचे व्यक्तिगत व सार्वजनिक जीवन नागरिक कसे समजावून घेतो आणि भावी राज्यकर्त्यांविषयी त्याच्या अपेक्षा काय आहेत, तसेच 'लोकशाही' या संकल्पनेचे त्याचे भान असते. ते 'चांगले राज्य', 'चांगले राज्यकत्रे' या संकल्पना स्पष्ट करणारे त्याचे ज्ञान (नॉलेज) असते. विकता येईल, असे ते 'होयबा-मत' नसते. (लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पाकीट-भेट संस्कृतीचे पाईक पत्रकारांनाही हा नियम लागू आहे.) 
लोकशाही जीवनपद्धतीत मतदात्या नागरिकाला हे आकलन नेमके कसे झाले किंवा होत असते; याची जाण तो नागरिक 'मतदान करणे' या कृतीतून व्यक्त करीत असतो. मतदान ही भौतिक जीवनातील दु:खाचा अनुभव कमी करणे आणि सुरक्षित, शांत, प्रगत, समृद्ध जीवनाची खात्री, या ऐहिक उद्दिष्टांसाठी केली जाणारी शुद्ध भौतिक कृती असते. 
       लोकशाहीतील मत म्हणजे असे अनेक घटकांनी बनलेले नागरिकाचे ज्ञान (नॉलेज) अशी संकल्पना मान्य केली तर 'भारतातील बेकारालाच काय पण भिकाऱ्यालाही अशा ज्ञानपूर्ण मतदानाचा अधिकार आहे' हा दावा अभिमानास्पद आहे, हे खरे. पण बेकार असणे, भिकारी असणे, गुन्हेगार असणे, भ्रष्ट असणे, बेवारस वृद्धत्व हे विद्यमान बहुपक्षीय राज्यकारभाराचे फळ आहे आणि त्या कारभाऱ्यांचे आपणा नागरिकांना भोगावे लागणारे कर्मफल आहे, तेच राजकारण आहे, अज्ञान आहे, हे कळत नाही. 'राजकारणाचे यथार्थ भान हे 'दर्शन' किंवा 'तत्त्वज्ञान' म्हणून विकसित होण्यापेक्षा तो निवडक राज्यकर्त्यांचा खेळ मात्र बनतो. 
       विद्यमान लोकशाही जीवनरीत भारतीय दर्शनांमधून निष्पन्न झालेली नाही तर ती ग्रीक-पाश्चात्त्य-युरोपीय तत्त्वज्ञानातून निर्माण झालेली आहे. तिला तत्त्वज्ञानात्मक इतिहास आहे. भारतात तो आयात झालेला आहे, हे भान निर्माण करणे, त्या भानाचे रक्षण करणे किंवा त्यात आपण आपला सहभाग देऊन ते भान अधिक समृद्ध करणे हे 'तत्त्वभान' या संकल्पनेचे स्वरूप म्हणता येऊ शकेल. म्हणजे नेमके काय करावयाचे? तर हे आयात (इम्पोर्टेड) तत्त्वज्ञान समजावून घेणे, त्याचे यथार्थ 'दर्शन' घेणे आणि त्या विचारविश्वाचा 'दार्शनिक' म्हणून आपण स्वत:ला नवे ट्रेिनग देणे आणि ज्ञानयुक्त मतदान करणे. 
      उदाहरणार्थ कर्तव्य ही संकल्पना भारतीय आणि पाश्चात्त्य परंपरेत आहे. 'कर्तव्य म्हणजे काय? ते कसे करावे?' हा प्रश्न श्रीमद्भगवद्गीता उपस्थित करते आणि आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात इमान्युएल कांट (१७२४-१८०४) हा तत्त्ववेत्ताही उपस्थित करतो. ''कर्तव्यपालनात नातेवाईकशाही, घराणेशाहीसारख्या भावनिक घटकांना हद्दपार करावे आणि निखळ धर्मरक्षण करावे, जनहित हाच धर्म मानावा'' हा उपदेश भगवद्गीता करते आणि कांट 'वस्तुनिष्ठ-व्यक्तिनिरपेक्ष केवळ कर्तव्यासाठी कर्तव्य' असा सिद्धांत मांडतो. सद्हेतू हाच कर्तव्याचा हेतू असावा, असे तो सांगतो. 
        वस्तुत: गीतेची कर्तव्यकठोरता कांटच्या 'कर्तव्यासाठी कर्तव्य' या संकल्पनेपेक्षा अधिक सकस मानता येईल. पण भारतीय जनतेच्या विचारविश्वात गीतेतील कर्तव्यकठोरतेऐवजी आत्म्याचे अमरत्व ठाण मांडून बसले. परिणामी इंग्रजी विद्या भारतात आली तेव्हा गीतेवर आधारित कठोर कर्तव्याची संकल्पना भारतीय लोकशाहीत विकसित झाली नाही. उलट पाश्चात्त्य परंपरेतील कांट, रुसो, हॉब्ज, मिल्ल, स्पेन्सर, मार्क्‍स, रॉल्ससारख्या पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांच्या विचारांमधून ही संकल्पना आली. हक्क, समता, समृद्धी या सामाजिक व राजकीय मूल्यांचा उदयसुद्धा याच पाश्चात्त्य परंपरेत आहे. त्याचाच प्रतिध्वनी लोकहितवादी, फुले, रानडे, राजा राममोहन राय, आगरकर, शाहू, आंबेडकर, महर्षी िशदे, गांधी ते संत तुकडोजी ते अण्णा हजारे, मेधा पाटकर यांच्या विचारात ऐकू येतो. 
         श्रीमद्भगवद्गीतेतील 'आत्मा अमर आहे' या तत्त्वज्ञानापेक्षा 'अधर्म करणाऱ्या कुणालाही; मग तो कितीही प्रिय नातेवाईक असला तरी केवळ जनहितार्थ, कसलाही स्वार्थ न बाळगता संपूर्ण अनासक्ती योग साधून, स्थितप्रज्ञ होऊन कर्तव्यकठोरतेने शिक्षा केली पाहिजे,' हे 'दर्शन' घडणे, घडविणे हे लोकशाहीसाठी उपयोजित आहे. हे अनेक तत्त्वभानांपकी एक तत्त्वभान, एखादे 'नवदर्शन' असेल. 
परंपरेत जे चांगले, योग्य व यथार्थ आहे, ते टिकवून ठेवण्याचा आग्रह योग्य आहेच, पण ते योग्य म्हणजे धर्म-जात-िलगभेद नाही किंवा मनुस्मृतीची भलावण नाही; तर उदाहरणार्थ गीतेचा नवा अर्थ शोधणे. भंजाळलेल्या आधुनिक अर्जुनांनी भाऊ धर्माधिकारी यांची 'गीता चिकित्सा' किंवा राजीव साने यांचे 'नवपार्थ हृद्गत' समजावून घेणे, ही तत्त्वभानाची आणखी एक दिशा मानली पाहिजे किंवा कर्तव्य कसे करावे यासाठी सुब्रतो रायसारख्या बेमुर्वत दु:शासन व दुर्योधनांना धडा शिकविणाऱ्या के. एम. अब्राहम, सी. बी. भावे यांसारख्या सनदी अधिकाऱ्यांकडे पाहता येईल. 
         अद्वैत वेदान्तच स्वीकारायचा असेल तर गांधीजींचा मोक्ष स्वीकारणे ही आधुनिकता आहे. 'आत्मकथा'च्या प्रस्तावनेत ते म्हणतात, 'ज्याच्यासाठी तीस वष्रे माझी धडपड चालली आहे ते आहे आत्मदर्शन, माझा मोक्ष! माझी सर्व हालचाल याच दृष्टिकोनातून चालते. माझे सर्व लिखाण याच दृष्टीने चालते आणि राजकीय चळवळीतही मनोभावे पडतो ते मोक्षासाठी!' गांधीजी गीतेकडे याच कर्तव्यभावनेने पाहतात. 
        शेकडो संप्रदायांमध्ये मिसळून गेलेल्या देशभरातील करोडो मतदात्यांचा मोक्ष कोणता? 'हे पाहा, आत्मा अमर आहे, असे मानणारे कोर्टात का जातात, हे मला कळत नाही,' असे सॉक्रेटीस म्हणतो. आत्मा अमर असेल तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे वाईट वाटण्याचे कारण नाही. अन्नसुरक्षेचा आग्रह धरण्याचे कारण नाही. त्यामुळे अमर आत्म्यापेक्षा जिवंत शेतकऱ्यांची, मतदारांची, नागरिकांची काळजी घेणारे राजकारण करणे, हा साऱ्यांचा मोक्ष असेल. 'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं' हे शेतीचे तत्त्वज्ञान असेल. 
        या आयात पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची मिसळण आपल्या संस्कृतीत कशी झाली, ती आणखी उपयुक्त कशी ठरेल असे पाहता येईल. पारंपरिक भारतीय आचारविचार आणि अनुभवविश्वात 'भारतीय ख्रिस्ती दर्शन' अथवा 'भारतीय इस्लाम दर्शन' असा नवा विचार प्रस्थापित झाला तरच भारतीय संस्कृती 'जल्प-वितंड-वाद' ही परंपरा जपणारी, नवा 'संवाद' साधणारी 'विश्लेषक' उदारमतवादी, सहिष्णु लोकशाही आहे; असे यथार्थ रीतीने म्हणता येईल.
       धर्माच्या रक्षणाचे कंत्राट घेणाऱ्या, कंत्राट हाच धर्म समजणाऱ्या लोकप्रतिनिधीपेक्षा अस्सल लोकशाहीचे रक्षण-संवर्धन हाच धर्म मानणारे आधुनिक धार्मिक नेते निवडण्याचे 'दार्शनिक शहाणपण' वास्तवात आणणे, हेही नवे तत्त्वभान आहे. हे तत्त्वभान ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या परंपरेत आहे; ते तत्त्वज्ञान ही आपली आजच्या काळात जगण्याची चौकट आहे, म्हणून त्याचा परिचय आवश्यक आहे.
      अर्थात पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचाच काय, पण कोणत्याही तत्त्वज्ञानाचा अथवा कशाचाही अभ्यास न करता अत्यंत सुखाने जगता येईल. पण ती निवड (तत्त्ववेत्ता जॉन स्टुअर्ट मिलचे शब्द वापरायचे तर..) 'सुखी डुक्कर की असमाधानी सॉक्रेटीस?' अशापैकी ठरेल.


तत्त्वभान १४ प्रज्ञानाचे प्रेम ०४ एप्रिल २०१४



प्रज्ञानाचे प्रेम

श्रीनिवास हेमाडे 
love of Philosophy
ज्ञान-अज्ञानाच्या सीमांचा अभ्यास करणाऱ्या, नैतिक बंधनांचा आग्रह का महत्त्वाचा आहे हे बदलत्या परिस्थितीत पुन्हापुन्हा स्पष्ट करून सांगणाऱ्या आणि विचार व कृती यांचा संबंध बुद्धी, आकलन, सामान्य धारणा व अंतर्दृष्टी यांच्याशी कसा आहे हे पडताळणाऱ्या शास्त्राचा 'प्रेमा'शी काय संबंध, हे कळले की 'फिलॉसॉफी'हा शब्द परका वाटत नाही..
       'तत्त्वज्ञान' असे ज्याचे भाषांतर केले जाते, त्या इंग्लिशमधील Philosophy या संज्ञेचा उगम प्राचीन ग्रीक विचारात आहे. Philosophy हा शब्द Philo + Sophia असा समासातून बनतो. Philo म्हणजे Love आणि Sophia म्हणजे शहाणपण. म्हणून Love of Wisdom = Philosophy. मराठीत 'शहाणपणाचे प्रेम' म्हणू. आणि Philosopher = Lover of Wisdom - 'शहाणपणाचा प्रेमिक.' 'शहाणपण' या शब्दासाठी 'प्रज्ञान' हा शब्द उपयोगात आणू. 
       काही जणांच्या मते मूळ ग्रीक शब्द Philosophie असा असून तो इंग्लिशमध्ये Philosophy असा बनला आणि फ्रेंच भाषेत Philosophie असाच राहिला. प्रबोधनकालीन फ्रेंच विचारवंतांसाठी philosophe असा वापरला गेला. बाराव्या शतकात filosofie असाही शब्द प्रचलित होता. नवव्या शतकानंतर अरबी जगतात ग्रीक तत्त्वज्ञानाचा; अ‍ॅरिस्टॉटलचा प्रवेश झाला. तेव्हा अरबी भाषेत philosophie चा उच्चारों'Falsafa असा झाला. falasifa हे त्याचे भाषांतर. अरबी भाषेत The Philosopher म्हणजे फक्त अ‍ॅरिस्टॉटल, हे मत आजही कायम आहे. 
       Philosopher आणि Philosophy हे शब्द पायथागोरसने (इ.स.पू. ५७० ते ४९५ अंदाजे) शोधले. त्याचे शिष्य हेरॉक्लीडस, पाँटिकस, डायोजिनीस लॉरेटियस यांच्या लेखनात हे उल्लेख आहेत, असे सिसिरो हा (इ.स.पू. १०६-४३) हा इतिहासकार, तत्त्ववेत्ता म्हणतो. पण प्रज्ञानाचे प्रेम या अर्थाने Philosophein हा शब्द पायथागोरसच्या आधी सर्वप्रथम अथेन्सचा राजकारणी धुरंधर नेता पेरिक्लीस (इ.स.पू. ४९३ ते ४२९) याने वापरल्याचे युसिडीसिस (इ.स.पू. ४४३..) या ग्रीक इतिहासकाराचे म्हणणे आहे. त्याच अर्थाने Philosophia हाही शब्द उपयोगात आणला गेला, असे अभिजात प्राचीनकालाचे इतिहासकार व प्राचीन ग्रीसचे अभ्यासक विद्यमान अमेरिकन तत्त्ववेत्ता रॉबिन ओस्बर्न (१९५७--) यांचे मत आहे. 
      पायथागोरसने Philosophy = Love of Wisdom असे समीकरण करण्यामागे एक कारण होते. त्या काळातील ऑलिम्पियाड स्पध्रेत भाग घेण्यासाठी येणाऱ्यांचे तीन प्रकार पायथागोरसने केले. नफाप्रेमी व्यापारी लोक (निम्न दर्जाचे), सन्मानप्रेमी स्पर्धक लोक (मध्यम दर्जाचे) आणि प्रज्ञानप्रेमी प्रेक्षक, साक्षीलोक (उच्च दर्जाचे). पशासाठी जगणाऱ्या आणि त्यासाठी जीवघेणी स्पर्धा करणाऱ्या माणसांच्या जगाकडे व बदलत्या विश्वाच्या पसाऱ्याकडे तटस्थतेने पाहणाऱ्या साक्षी प्रेक्षकाला पायथागोरस Philosopher म्हणतो. त्यांना जाणवणारे प्रज्ञान दैवी असते. 
       व्युत्पत्ती पाहता, 'प्रेम' या कृतीबाबत फार शंका उरत नाही, कारण ती एक भावनिक बाब आहे. प्रश्न उपस्थित होतो तो kwisdoml (Sophia) ची व्याख्या कशी आणि कुणी करायची याबाबत. (कोणत्याही संस्कृतीत खरे तर इथूनच सत्तेचे राजकारण सुरू होते.) 
        ग्रीकांच्या मते 'प्रज्ञान'चे दोन अर्थ. दैवी प्रज्ञान आणि मानवी प्रज्ञान. दैवी प्रज्ञान याचा अर्थ ईश्वराचे प्रज्ञान. हे विश्व प्रचंड, अवाढव्य असून त्यातील नियम, ही ईश्वरी निर्मिती आहे. विश्वात एक अंतर्गत सुसंगती, सुमेळ आहे. विश्वाचे स्वरूप गणिती आहे. विश्वाची रचना, निर्मिती पाहता त्यासाठी आवश्यक असणारे गुण व क्षमता केवळ ईश्वरातच असू शकते. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सम्राट, निर्मिक, चतन्यमय, उदात्त स्वरूप हेच ईश्वराचे प्रज्ञान आहे.
         'प्रज्ञान' मिळविण्याची क्षमता माणसात नसते. प्रज्ञान हा दैवी गुण असल्याने माणूस प्रज्ञानी असत नाही आणि ईश्वरासह विश्वाची अंतिम सत्ये भव्य असून त्याची ज्ञानप्राप्ती करून घेणे माणसाला शक्य नाही. मग माणूस काय मूर्ख आहे काय? ग्रीकांच्या मते माणूसही प्रज्ञानी आहे, पण त्याचे स्वरूप वेगळे आहे. 
        मानवी प्रज्ञानाचे स्वरूप स्पष्ट करताना ग्रीकांनी प्रज्ञान आणि बुद्धिमत्ता (Wisdom & Intelligence) यात फरक केला. बुद्धिमान माणूस चालता बोलता विश्वकोश असेल पण तो प्रज्ञानी असेल असे नाही. प्रज्ञानी असणे म्हणजे नीतिमान असणे. बुद्धिमान असूनही एखादा माणूस दुष्ट असू शकतो. उलट तो अत्यंत पद्धतशीरपणे दुष्टपणा करतो. प्रज्ञानी माणूस बुद्धिमान असतोच, पण तो नीतिमानही असतो. नीती ही प्रज्ञानाची अट असते. परिणामी एखादा निरक्षरही प्रज्ञानी असू शकतो. सॉक्रेटिस, रामकृष्ण परमहंस, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, बहिणाबाई. 
       मानवी प्रज्ञानाचे स्वरूप काय? मानवी प्रज्ञान दोन रीतींचे आहे. पहिली रीत : स्वत:च्या ज्ञानाची मर्यादा जाणणे. माणसाच्या क्षमतांच्या तुलनेत ईश्वर, विश्व व विश्वातील नियम, घटना याबाबतचे त्याचे ज्ञान मर्यादित आहे. त्यात जन्ममृत्यूच्या अज्ञानाची भर आहे. तेव्हा अज्ञानाचे ज्ञान ही मर्यादा कबूल करण्याची विनम्रता हेच माणसाच्या प्रज्ञानी असण्याचे प्रसादचिन्ह आहे. हे भान असणारे ते खरे प्रज्ञानाचे प्रेमिक असतात. या अर्थाने ग्रीक परंपरेतील पहिला प्रज्ञान प्रेमिक म्हणजे थेल्स (इ.स.पू. ६२४ ते ५४६).
       ही भूमिका नंतर सॉक्रेटिसने अधिकृत बनविली. तो म्हणतो 'मी असा विचार करीत नाही, की जे मला माहीत नाही, ते मला माहीत आहे' (do not think, that I know ; what I do not know ) वेगळ्या भाषेत ग्रीकांच्या मते प्रज्ञानाचा पहिला विषय 'अज्ञान' हाच असला पाहिजे. 
      दुसरी रीत : प्राचीन ग्रीकांसाठी प्रज्ञान म्हणजे सद्गुण. प्रज्ञानाचे प्रेम म्हणजे सद्गुणांचे प्रेम हा अर्थ सॉक्रेटिस आणि प्लेटो यांनी उपयोगात आणला. न्याय, शहाणपण, धर्य आणि संयम हे चार प्रमुख पायाभूत (काíडनल व्हच्र्यु) पारंपरिक ग्रीक सद्गुण सत्ताधिकाऱ्यांत असले पाहिजेत, असे नतिक बंधन प्लेटो घालून देतो. अ‍ॅरिस्टॉटल मात्र घटनेचे कारण जाणणे या वैज्ञानिक अर्थाने प्रज्ञान हा शब्द वापरतो. 
       सोळाव्या शतकापासून वैज्ञानिक क्रांती आणि औद्योगिक क्रांतीनंतर तत्त्वज्ञानाच्या संकल्पना बदलत राहिल्या. अनेक तत्त्ववेत्त्यांनी आणि तात्त्विक विचारप्रणालींनी आपआपल्या काळाशी सुसंगत अर्थ देण्याचा प्रयत्न केला. प्रस्तुत ग्रीक अर्थानुसार ईश्वरास अस्तित्व आहे, पण अनेक निरीश्वरवाद्यांनीही आपापल्या व्याख्या केल्या. ज्ञान, अनुभव, आकलन, सामान्य धारणा आणि अंतर्दृष्टी यांचा उपयोग करून विचार करण्याची आणि कृती करण्याची क्षमता, ज्ञानाची चिकित्सा, तर्कशुद्ध मांडणी, समर्थन आणि विचारातील खुलेपणा हा विसाव्या शतकातील 'प्रज्ञान'चा अर्थ आहे.
       प्रज्ञान म्हणजे 'ज्ञानाची र्सवकष ताíकक चिकित्सा' या अर्थाशी आणि प्लेटोच्या सद्गुण संकल्पनेशी जुळणारी प्राचीन भारतीय संकल्पना म्हणजे 'आन्वीक्षिकी विद्या.' आचार्य कौटिल्याने (इ.स.पू. ३७५ - २२५ अंदाजे) 'अर्थशास्त्र' या प्राचीन ग्रंथात हिचे (अध्याय २.१ : विद्यासमुद्देश) स्वरूप स्पष्ट केले आहे. आन्वीक्षिकी, त्रयी (तीन वेदांचे ज्ञान), वार्ता (शेती, व्यापार) आणि दंडनीती (प्रशासन) अशा चार विद्यांचा उल्लेख करतो. आन्वीक्षिकी म्हणजे सांख्य, योग आणि लोकायत ही तीन दर्शने. सर्व विद्यांना मार्गदर्शक असणारी ही विद्या आहे, असे आचार्य स्पष्ट करतात! 
      विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात 'प्रज्ञान'चे अर्थ कोणते? या प्रश्नाचे उत्तर कठीण आहे. तरीही उत्तर-आधुनिकतेची (postmodernity) जाणीव असे एक उत्तर देता येईल. अर्थात कोणती उत्तर-आधुनिकता, हे निश्चित करावे लागेल. चित्रकलेच्या प्रांतात शमन आर्ट्स (shamanarts) या कलापंथाची उद्गाती ज्युडी गार्डनर (Judy Gardner) 'उत्तर-उत्तर-उत्तर- आधुनिकतेचा जाहीरनामा' मांडू पाहते. एम. एफ. हुसेन भारताबाहेर मरण पावतो आणि त्याचा मृतदेह मायभूमीत त्याच्या जन्मगावी पंढरपुरी आणता येत नाही, ही आधुनिक मुक्त विचारांची भारतीय उत्तर-आधुनिक शोकांतिका ठरते. अर्थात, भारतीय विचारविश्वाने आधुनिकताही अद्यापि धडपणे व्यक्तिगत आणि सामाजिक-राजकीय जीवनात आणलेली नाही. त्यामुळे शोकांतिका असण्यातही आपणास बरीच प्रगती करावयाची आहे.

तत्त्वभान १३ तत्त्वज्ञान, ब्रह्मज्ञान आणि दर्शन २७ मार्च २०१४


श्रीनिवास हेमाडे 
आदि शंकराचार्य आठवे शतक 

'तत्त्वज्ञान', 'फिलॉसॉफी' आणि 'दर्शन' हे शब्द अनुक्रमे मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांत जणू एकाच अर्थाने आज वापरले जातात.. व्यवहारात ते ठीकही असेल; पण 'फिलॉसॉफी'ची आणि 'दर्शनां'ची जडणघडण पाहता त्यांना या एकाच (त्रिभाषा) सूत्रात सहजगत्या ओवता येत नाही, हे समजेल. दर्शन आणि तत्त्वज्ञान हेही एकमेकांचे प्रतिशब्द नाहीत, हे शक्यतोवर सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा या लेखाचा उद्देश!

       इंग्लिशमधील Philosophy या शब्दाचे मराठी भाषांतर म्हणून आणि आधुनिक काळात Philosophy चा सर्वमान्य पर्यायी शब्द म्हणून 'तत्त्वज्ञान' हा शब्द सर्व वैचारिक क्षेत्रात स्वीकारला गेला आहे. ग्रीक तत्त्वज्ञान, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, राजकीय तत्त्वज्ञान, सामाजिक तत्त्वज्ञान, विज्ञानाचे तत्त्वज्ञान, पर्यावरणाचे तत्त्वज्ञान इत्यादी शब्द या अर्थाने येतात. 
          संस्कृत भाषेतून मराठीत अथवा अन्य भारतीय भाषांमध्ये 'तत्त्वज्ञान' या संज्ञेला दर्शन, ब्रह्मज्ञान आणि दर्शनशास्त्र हे आणखी काही पर्याय मानले गेले आहेत. त्यांनाही बऱ्याच वेळेस Philosophy या शब्दाचे मराठी भाषांतर मानले जाते. कल्ल् Philosophy, ही Western Philosophy यांचे भाषांतर ग्रीक दर्शन, पाश्चात्त्य दर्शन असे केले जाते. उत्तर भारतातील हिंदी भाषिक पट्टय़ात 'दर्शन विभाग' म्हणजे department of philosophy असे वापरले जाते. हे सारे शब्दव्यवहार वरकरणी चुकीचे वाटत नाहीत. 
          मात्र philosophy आणि 'तत्त्वज्ञान' या समानार्थक संज्ञा नाहीत. त्या संकल्पना तात्त्विक आहेत. पण त्यांचे अर्थ वेगळे आहेत. त्यांच्यात समान धागा गृहीत धरून त्यांना समान अर्थ दिला गेला आहे. philosophyहा शब्द मराठीत 'फिलॉसॉफी' असे लिहिणे हा भाषिक दृष्टीने इंग्रजी शब्दाचा उच्चार लिहिणे असा होईल. हे 'लिप्यंतर' ठीक आहे, पण 'फिलॉसॉफी' या मराठी उच्चाराचे भाषांतर म्हणून 'तत्त्वज्ञान' असे होत नाही. हा बारीक भेद लक्षात घेणे आवश्यक असते. 
          आता केवळ 'तत्त्वज्ञान' हा वेगळा सुटा शब्द घेतला तर त्याला खास विशिष्ट भारतीय पारिभाषिक अर्थ आहे. 'तत्त्वज्ञान' या शब्दाला भारतीय संदर्भात दर्शन, ब्रह्मज्ञान आणि दर्शनशास्त्र हे पर्यायी संस्कृत शब्द आहेत. ते खास देशी शब्द असून त्यांनाही विशिष्ट अर्थ आहेत. त्यांचे अर्थ समान नाहीत, पण परस्परपूरक आणि परस्परात गुंतलेले आहेत. 
        तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्वाचे ज्ञान. तत्त्व हा शब्द 'तत्' म्हणजे 'ते' धातूपासून बनतो. या 'तत्'चे 'असणे' हे 'तत्त्व' आणि त्या 'तत्त्वा'चे ज्ञान ते तत्त्वज्ञान. हा समान अर्थ वैदिक िहदू विचारसरणीत आहे. त्यानुसार तत्त्व म्हणजे पदार्थाचे यथार्थ स्वरूप, त्याचे ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान. पदार्थ म्हणजे समग्र अस्तित्व- जग व माणसे. जगाचे व माणसाचे साररूप जाणणे म्हणजे तत्त्व जाणणे; ते तत्त्वज्ञान. न्यायदर्शनात (वात्स्यायन १.१.१) तत्त्वज्ञान पदाची व्याख्या केली आहे : 'तत्' म्हणजे 'सत्' व 'असत्.' या दोन्हींचे यथार्थ व अविपरीत स्वरूपातील ज्ञान होणे, हे 'तत्त्व' होय. या अर्थाने कोणत्याही वस्तुस्थितीचे अथवा पदार्थाचे यथार्थ ज्ञान- ती जशी आहे तशीच समजणे म्हणजे तत्त्वज्ञान होय. वस्तुस्थिती म्हणजे असणे वा नसणे, याचे ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान. अशा सोळा तत्त्वांचे किंवा पदार्थाचे ज्ञान झाले की मुक्तिमार्ग खुला होतो. (तत्त्वज्ञानाद् दु:खान्त्योछेदलक्षणं..) 
         आदी शंकराचार्याच्या मते, 'तदति सर्वनाम सर्व च ब्रह्म तस्यनाम / तद् भावस्तत्वं ब्रह्मणो याथात्म्यम' म्हणजे 'तत्त्व हे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे विश्वातील सर्व पदार्थाना लागू पडणारे तत्त्व. ब्रह्म व्यापक असल्याने सर्व पदार्थाना व्यापून आहे. म्हणून त्याचे 'तत्' हे नाव. थोडक्यात 'तस्य भाव: तत्त्वं.' त्याचे ज्ञान तेच ब्रह्मज्ञान. (पण पुढे मी म्हणजे ब्रह्म किंवा 'मी नाहीच, ब्रह्मच' असे रूपांतर होते. ते आत्मज्ञान हेच तत्त्वज्ञान बनते.) 
      'दर्शन' ही 'तत्त्वज्ञान' या शब्दाप्रमाणेच विशिष्ट रचना आहे. 'दर्शन'चा साधारण अर्थ भेटणे, कधी तरी भेटणे म्हणजे 'दर्शन अलभ्यम्.' दर्शनचा मूलार्थ दृष्टी. संस्कृत 'दृश' धातूपासून 'दर्शन' संज्ञा बनते. 'दृश'पासून 'दृश्य' शब्द तयार होतो. जे दिसते तो पाहण्याचा विषय = 'दृश्य', ते पाहणारी व्यक्ती = द्रष्टा आणि या द्रष्टय़ाला जे दिसते ते 'दर्शन.' तेव्हा हे दर्शन 'घेतो' तो दार्शनिक. 
       'दर्शन'चा हा अर्थ लक्षात घेऊन 'योग्य अधिकारी साधकापुढे तात्त्विक विचार स्वत:हून प्रगट होऊन त्यास दर्शन देतात, अशी श्रद्धा बनली. प्राचीन ऋषींची अशी धारणा होती की मंत्र त्यांना प्रत्यक्ष दर्शन देतात - 'ऋषिर्दशनात्.' (सर्वदर्शन संग्रह - पं. र. प. कंगले). येथे 'दर्शन'चा अर्थ विचार सुचणे, स्फुरणे असा घेतला पाहिजे. हे दर्शन दोन प्रकारे आले असावे. भारतीय दर्शनांची रचना अनेक शतके होत होती. त्यामुळे आधीच्या काळात काव्यात्म रूपात स्फुरलेले प्राथमिक विचार आणि नंतरच्या काळात त्यांना जाणीवपूर्वक दिलेले सुव्यवस्थित काटेकोर रूप, असे दोन अर्थ 'दर्शन'चे करता येतील. दर्शनांची सुव्यवस्थित मांडणी केली की त्यांना 'शास्त्र' म्हणतात. ते जाणतो तो शास्त्री, दार्शनिक. अशी मांडणी पूर्ण झाली की 'दर्शन' किंवा 'तत्त्वज्ञान' या संकल्पनेची परिपूर्ण व्याख्या तयार होते. ती म्हणजे 'जग आणि मानवी जीवनाकडे विचारपूर्वक पहिले असता चिंतकाला जाणवणारे त्यांचे स्वरूप म्हणजे दर्शन किंवा तत्त्वज्ञान.' 
         माणसाला पाच ज्ञानेंद्रिये असली तरी कोणत्याही ज्ञानेंद्रियापेक्षा डोळा हे सर्वात विश्वसनीय म्हणून सत्याच्या जवळ जाणारे इंद्रिय असल्याने 'दर्शन' महत्त्वाचे मानले गेले. यासाठीच 'चक्षुर्वैसत्यम' किंवा 'चक्षुर्वै प्रतिष्ठा' म्हणतात. वरील अर्थ पाहता 'तत्त्वज्ञानसाधनशास्त्रदर्शनम्' म्हणजे 'तत्त्वाचे ज्ञान होण्याला साधन असे शास्त्र म्हणजे दर्शन' असे म्हटले आहे. दर्शनालाच बौध दर्शनात 'दिठ्ठी' म्हटले आहे. 
         असे दर्शन प्रत्येकाला वेगवेगळे झाले. अशा विविध दृष्टिकोनांची चर्चा करते ते दर्शनशास्त्र होय. त्यांच्यात श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद करता येत नाही. त्यामुळे चार्वाक दर्शन नीच आणि अद्वैत वेदान्त (नुसतेच श्रेष्ठ असे नाही तर) सर्वश्रेष्ठ असे म्हणणे चूक आणि दिशाभूल करणारे आहे. पण भेदनीती केली गेली. आणि भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान किंवा वेदान्त; म्हणजे 'अद्वैत वेदान्ताचे तत्त्वज्ञान' असे एक लाडके समीकरण बनविले गेले. पण 'भारतीय तत्त्वज्ञान' ही एक पुन्हा व्यापक संकल्पना आहे. भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे केवळ 'अद्वैत वेदान्ताचे तत्त्वज्ञान' हे कितीही लाडके समीकरण असले तरीही हे समीकरण हे 'तत्त्वज्ञान' या संकल्पनेच्या अनेक अर्थापकी एक अर्थ आहे. 
         'भारतीय तत्त्वज्ञान' या संकल्पनेत िहदू वैदिक तत्त्वज्ञान, बौद्ध तत्त्वज्ञान व जैन तत्त्वज्ञान या तीन मोठय़ा विचारविश्वांचा समावेश होतो. आणि खुद्द 'िहदू वैदिक तत्त्वज्ञान' या संकल्पनेत न्याय, वैशेषिक, सांख्य, योग आणि पूर्वमीमांसा अशा आणखी पाच विचारसरणी येतात. अद्वैत वेदान्त हे सहावे तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे केवळ 'अद्वैत वेदान्ताचे तत्त्वज्ञान' हे कितीही लाडके समीकरण असले तरीही ते चुकीचे ठरते. केवळ एकाच्याच नावाने आपले थोर तत्त्वज्ञान जगात ओळखले जावे, हा आपणच पसरवत असलेला गरसमज आहे. उलट प्रस्तुत लोकशाही जीवनपद्धतीनुसार आज 'भारतीय तत्त्वज्ञान' ही संकल्पना आणखी व्यापक करणे गरजेचे आहे. 
      पाश्चात्त्यांना Philosophy या शब्दातून काय म्हणावयाचे आहे आणि भारतीय चिंतन विश्वात त्या अर्थाशी समान असणारा विचार कोणता आहे, ते पुढील लेखात पाहू.


Thursday 12 June 2014

तत्त्वभान १२ भारतीय विज्ञान व वैज्ञानिक पद्धती ! २० मार्च २०१४

Debiprasad.jpg
देबीप्रसाद चट्टोपाध्याय
 (१९१८-१९९३)



भारतीय विज्ञान व वैज्ञानिक पद्धती!

श्रीनिवास हेमाडे
भारतीय विज्ञान किंवा वैज्ञानिक पद्धती असे शब्द उच्चारताच आश्चर्य वा शंका या प्रतिक्रिया येऊ शकतात. विज्ञानमूलक विचार अस्फुट रूपात असणे आणि त्या विचारांची प्रत्यक्ष वैज्ञानिक पद्धती बनणे, हा भारतीय आणि पाश्चात्त्य विज्ञानाच्या वाटचालींतील फरक आहे. तो का आहे, हेही समजून घेतले पाहिजे..

         आधुनिक विज्ञानाच्या संदर्भात चर्चा करताना 'विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती ही केवळ ग्रीक-पाश्चात्त्यांची, देन आहे', असा एक सामान्य समज आहे. त्यात तथ्यही आहे, परंतु 'निसर्गातील आंधळ्या शक्ती सोडल्या तर जगात चलनवलन करणारे असे काही नाही की त्याचा उगम ग्रीसमध्ये नाही', अशी दर्पोक्ती सर हेन्री मेन (१८२२-१८८८) या ब्रिटिश इतिहासकाराने केली. यातून युरोपियनांचा अहंकार दिसतो. कारण ज्याला भारतीय दर्शन परंपरेचा योग्य परिचय आहे, त्या अभ्यासकाला हा दावा उद्दाम व हास्यास्पद आहे, हे लक्षात येऊ शकते. 
       मानवी संस्कृतीत वस्तुत: प्राचीन भारतीय आणि प्राचीन ग्रीक परंपरा या दोनच स्वायत्त व अस्सल तात्त्विक परंपरा आहेत. या दोन संस्कृतींमध्ये इतर कोणत्याही मानवी संस्कृतीपेक्षा जास्त असे काही तरी आहे. विश्व व मानव यांचे नाते आणि मानवी जगाची विविध प्रकारची रचना करताना त्यात समाविष्ट असणाऱ्या अनेक घटकांची संकल्पनात्मक, तार्किक मांडणी करून त्यातील योग्य ते घेणे व कालबाह्य़ ते टाकून देणे, या कृतींद्वारे तत्त्वज्ञान निर्माण करणे, त्याचे तर्कशास्त्र रचणे, हे तत्त्वज्ञानात्मक कार्य केवळ या दोन संस्कृतींमध्ये घडले आहे. पण भारतीय आणि ग्रीक-पाश्चात्त्य परंपरेतील फरक असा की, भारतीय परंपरा कुंठित झाली आणि पाश्चात्त्य परंपरा प्रवाही, गतिमान राहिली. जिला 'आधुनिकता' (मॉडर्निटी) असे नाव दिले जाते तिची निर्मिती युरोपीय-पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाने केली आहे आणि आपण भारतीय या अर्थाने आज आधुनिक आहोत. विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती ही आधुनिकता आहे. भारतीय संस्कृती व दर्शन परंपरा प्राचीन असल्याने भारतातही प्राचीन काळापासून वैश्विक विज्ञान व वैज्ञानिक पद्धती होती, असा दावा केला जातो. पण ज्या सांस्कृतिक अभिसरणाने पाश्चात्त्य विज्ञान व वैज्ञानिक पद्धती सर्वमान्य झाली, तशी भारतीय विज्ञान व वैज्ञानिक पद्धती का होऊ शकली नाही, याचा शोध घेणे आवश्यक आहे. आणि असा प्रयत्न चालू आहे. देबीप्रसाद चट्टोपाध्याय (१९१८-१९९३) या भारतीय तत्त्ववेत्त्याच्या मते भारतीय दर्शन परंपरेत एक अतिशय बलशाली भौतिकवादी विज्ञानवादी विचार होताच, पण विज्ञान परंपरा होती. त्यांच्या मते आयुर्वेद म्हणजे चरकसंहिता हाच केवळ एकमेव प्राचीन ग्रंथ असा आहे, की जो खऱ्या अर्थाने इहवादी आणि आधुनिक अर्थाने ज्यास विज्ञान म्हणता येईल, अशा क्षमतांचा आहे. देबीप्रसाद यांनी प्राचीन भारतीय विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती या विषयासाठी सारे आयुष्यच वाहून घेतले. या संदर्भातील 'लोकायत' आणि 'सायन्स अ‍ॅण्ड सोसायटी इन एन्शंट इंडिया' ही त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत. तथापि त्यांच्या मते वर्ण-जाती-िलग भेदभाव हाच विज्ञान विकासातील मुख्य अडथळा ठरला. 'व्हॉट इज लिव्हिंग अ‍ॅण्ड व्हॉट इज डेड इन इंडियन फिलॉसॉफी' या त्यांच्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, 'भारताच्या विद्यमान तात्त्विक गरजा समोर ठेवून आपल्या दार्शनिक परंपरांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे' आणि 'आपल्या विद्यमान तात्त्विक गरजा म्हणजे इहवाद, बुद्धिवाद आणि विज्ञाननिष्ठा.' 
        देबीप्रसाद यांचे मत लक्षात घेता प्राचीन भारत म्हणजे विद्यमान नकाशात दिसणारा भारत असा नसून भारतीय उपखंड असे समजणे योग्य आहे. अश्मयुगीन काळापासून भारतीय उपखंडात जीवन जगण्याची रीत म्हणून काही एक विज्ञान होतेच. मेहेरगढ(आता पाकिस्तानात)पासून मानवी वस्ती आढळते, याचा अर्थ काहीएक निश्चित विज्ञान होते. बौधायन, आपस्तंभ, लगद, आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, कणाद, वराहमिहिर, नागार्जुन, सुश्रुत, चरक, पतंजली, लल्ला गोिवदस्वामी, गणेशोपाध्याय, पक्षधर, नारायण पंडित नीलकंठ ते श्रीनिवास रामानुजन, श्रीराम अभ्यंकर, वसिष्ठ नारायण सेठ, दिवाकर विश्वनाथ, रामन, नरेंद्र करमरकर, जगदीशचंद्र बोस, सी. चंद्रशेखर, प्रसंतचंद्र महालनोबीस, डी. के. रायचौधरी, शकुंतलादेवी, जयंत नारळीकर, यशपाल यांच्यापर्यंत विज्ञान विचाराची परंपरा आहेच. व्याकरण, भाषाशास्त्र, तर्कशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशात्र, अर्थशास्त्र, एवढेच काय पण कामशास्त्रही प्राचीन काळापासून भारतात प्रचलित आहे. पण या साऱ्यांमधून विज्ञान, विज्ञानाचे तत्त्वज्ञान, वैज्ञानिक पद्धती अशी ज्ञानरचना विकसित झाली आहे, असे दिसत नाही. शिवाय भारतात िहदू, बौद्ध, जैन हे तीन प्राचीन आणि शीख हा अर्वाचीन धर्म मिळून चार धर्म आहेत. त्यांची प्रत्येकाची स्वतंत्र धार्मिक अधिसत्ता आहे. तिचा प्रभाव सर्वाधिक आहे. 
       विद्यमान भारतीय शिक्षण पद्धतीत विज्ञान शिकविले जाते म्हणजे सिद्धांत शिकविले जातात; पण वैज्ञानिक दृष्टी दिली जात नाही. प्रत्येक भारतीय नागरिकात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, हे भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार (विभाग ४ अ, कलम ५१ अ) सरकारी धोरणांचे कर्तव्य आहे. वैज्ञानिक पद्धती प्रश्न विचारण्यापासून सुरू होते, पण आपली परीक्षा पद्धती मुलांचे प्रश्न विचारणे बंद करून टाकते. पाठांतरावर भर देणारे पोपट तयार करणे, हे शालेय पोपटविज्ञान शिक्षण व्यवस्था आणि पालक मंडळीही पाळतात. 
      भारतात विज्ञान व वैज्ञानिक पद्धती या संज्ञा भावनिक व धार्मिक अर्थाने येतात. उदाहरणार्थ, बौद्ध दर्शनात विज्ञान शब्द येतो, हा आधुनिक अर्थ नाही. त्याचा अर्थ मानवी जाणीव. पण यात वैज्ञानिक पद्धतीही उपलब्ध आहे, असाही काही जणांचा दावा आहे. (वालपोला राहुला, पॉल डेमीविल - व्हॉट बुद्धा टॉट १९७४ - Walpola Ra¯hula, Paul Demie´ville : What the Buddha Taught). आता हेही खरे आहे की, रसेल, आइनस्टाइन, ओपेनहायमर, नील्स बोर या सारख्या दिग्गजांनी बौद्ध तात्त्विक विचारात वैज्ञानिक विचाराची बीजे शोधली, पण 'बौद्ध विचार हे आधुनिक अर्थाने विज्ञान आहे' असे त्यांनी म्हटलेले नाही. विपश्यना गुरू सत्यनारायण गोएंकासुद्धा यात विज्ञान शोधतात, पण ते कोणत्या अर्थाने हे तपासले पाहिजे, असे करणे हीच वैज्ञानिक दृष्टी आहे. 
      योगविद्या हे विज्ञान आहे, असा योग शिक्षकांचा आणि योग व निसर्गोपचार केंद्र मालकांचा आवडता सिद्धांत आहे. पण योग हे परंपरेनुसार भारतीय मानसशास्त्र समजले जाते, तरीही पाश्चात्त्य मानसशास्त्र ज्या रीतीचे मानसशास्त्र आहे तसे ते विज्ञान नाही. विज्ञानमूलक विचार अस्फुट रूपात असणे आणि त्या विचारांची प्रत्यक्ष वैज्ञानिक पद्धती बनणे यात फरक आहे. विज्ञानाच्या जवळ जाणारा अथवा विज्ञानाची बीजे असणारा विचार असणे आणि वैज्ञानिक पद्धती बनविणारा अस्सल वैज्ञानिक विचार असणे, या संकल्पनांमध्ये फरक केला पाहिजे. म्हणूनच पाश्चात्त्य विज्ञान तत्त्ववेत्त्यांनी मिथ्या विज्ञान आणि अस्सल विज्ञान असा फरक केला. गेल्या काही दशकांपासून भारतीय परंपरेचे पुनर्मूल्यांकन होत आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच्या राजकीय व सामाजिक सुधारणांपेक्षा हे पुनर्मूल्यांकन वेगळ्या रीतीचे व भिन्न उद्दिष्टांचे आहे. परंपरेचे पुनर्मूल्यांकन नेहमीच तात्त्विक असावे लागते, त्यानुसार इंडियन कौन्सिल फॉर फिलॉसॉफिकल रिसर्च या संस्थेने संशोधन प्रकल्प राबविला आहे. देबीप्रसादांच्याच संपादनाखाली आयसीपीआरतर्फे 'हिस्ट्री ऑफ सायन्स, फिलॉसॉफी अ‍ॅण्ड कल्चर इन इंडियन सिव्हिलायझेशन' हा ५० खंडांचा प्रकल्प भारत सरकारने राबविला आहे. यातील काही खंड केवळ भारतीय विज्ञान व वैज्ञानिक पद्धती या विषयावरील आहेत.

Wednesday 11 June 2014

तत्त्वभान २४ तात्त्विक दृष्टिकोन.. लोकशाहीसाठी १२ जून २०१४

तात्त्विक दृष्टिकोन.. लोकशाहीसाठी

theoretical outlook for democracy
श्रीनिवास हेमाडे 

तत्त्वज्ञान हे नेहमी लोकांकडून लोकांसाठी निर्माण केले जाते. साहजिकच लोकांचेच प्रश्न सोडविणे, हे तत्त्वज्ञानाचे काम असते. एखाद्या सामाजिक प्रश्नाला तात्त्विक प्रश्नाचा दर्जा कधी लाभतो, हाच एक तात्त्विक प्रश्न असतो. राज्य म्हणजे काय ? या तात्त्विक प्रश्नाचे सामाजिक रूप 'आदर्श राज्य म्हणजे नेमके कोणते राज्य ?' हे आहे. मूळ तात्त्विक प्रश्नाच्या उत्तराकडून सामाजिक प्रश्नाकडे जाणे हाच तात्त्विक प्रवास बनतो.

           ज्ञान, अस्तित्व, तर्क, सौंदर्य, आणि नीति या तत्त्वज्ञानातील पाच मुलभूत संकल्पनांच्या आधारे अनुक्रमे ज्ञानशास्त्र, अस्तित्वशास्त्र, तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र आणि नीतिशास्त्र या तत्त्वज्ञानाच्या या शाखा पाच प्रश्न उपस्थित करतात - ज्ञान म्हणजे काय ? (ज्ञानशास्त्र) अस्तित्व म्हणजे काय ? (अस्तित्वशास्त्र), तर्क म्हणजे काय ? (तर्कशास्त्र), सौंदर्य म्हणजे काय ? (सौंदर्यशास्त्र) आणि नीति म्हणजे काय ? (नीतिशास्त्र).
          हे प्रश्न म्हणजे एका अर्थाने कोणत्याही ज्ञानशाखेला ज्ञानाचा आणि विज्ञानाचा दर्जा देण्याचा साचा. उदाहरणार्थ राज्य, समाज, शासन, प्रशासन किंवा प्रेम, मत्री, करुणा, स्वातंत्र्य, समता, निर्भयता, सुरक्षितता, शेजारधर्म, वाहतुकीचा नियम, किंवा अगदी रस्त्यावर चालावे कसे ? शेजारी मयत झाली असेल तर आपण डीजे वाजवावा का ? किंवा संगणक, टोलनाका, दुकान, शिक्षणसंस्था, वृत्तपत्र या सारख्या संकल्पना सुस्पष्टपणे समजावून घ्यावयाचे असतील तर हे पाच प्रश्न उपयोगी असतात. आदर्श राज्य ही संकल्पना समजावून घ्यावयाची असेल तर मूलत राज्य म्हणजे काय ? (राज्याचे ज्ञानशास्त्र) राज्य अस्तित्वात कसे येते? (राज्याचे अस्तित्वशास्त्र), राज्य चालते म्हणजे काय ? (राज्याचे तर्कशास्त्र), ते सुंदर असू शकते काय ? (राज्याचे सौंदर्यशास्त्र) आणि त्याची नतिक ध्येयधोरणे कोणती ? (राज्याचे नीतिशास्त्र), हे समजावून घेणे गरजेचे आहे.
      राज्याचे ज्ञानशास्त्र राज्य संकल्पनेचे स्वरूप स्पष्ट करते, राज्याचे अस्तित्वशास्त्र रानटी टोळी समाजापासून राज्य ही सुव्यवस्थित रचना कशी निर्माण होते, हे स्पष्ट करते, राज्याचे तर्कशास्त्र 'राजकारण' नेमके कसे होत असते, याचा खुलासा करण्याचा प्रयत्न करते, तर राज्याचे सौंदर्यशास्त्र राज्याच्या कला, साहित्य, संगीत, धर्मविषयक धोरणांची एकात्मता सांगू पाहते आणि राज्याचे नीतिशास्त्र राजेशाही, घराणेशाही, लष्करशाही, हुकुमशाही की लोकशाही, अशा कोणत्या स्वरूपाचे राज्य नतिक ठरू शकते, याचे स्पष्टीकरण देऊ पाहते. या साऱ्या प्रश्नांच्या उत्तर देण्यातून 'आदर्श राज्याचे स्वरूप कोणते?' याचे ज्ञान होते. 
          भारतात महाभारतकाळापासून 'राज्य' संकल्पनेची तात्त्विक चर्चा चालू आहे. ग्रीक परंपरा अथेन्स-स्पार्टा किंवा पेलोपोनेसियन युद्धापासून ही चर्चा करते. रामराज्य ही प्राचीन काली आणि शिवराज्य ही मध्ययुगीन भारतात आदर्श राज्यव्यवस्था व समाज व्यवस्था मानली गेली होती. 
      भारतीय चातुर्वण्र्य, जातीव्यवस्था, स्त्री-पुरुष लिंगभेद ही एकेकाळी आदर्श राज्य रचना आणि समाजव्यवस्था होती. पण इंग्रजी विद्या आणि वसाहतवाद यांचा परिणाम म्हणून या साऱ्या सनातन आदर्श व्यवस्थेचे नवे ज्ञानशास्त्र, अस्तित्वशास्त्र, तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र आणि नीतिशास्त्र रचण्याचा प्रयत्न झाला. राजा राममोहन रॉय, न्या. रानडे, आगरकर व्हाया फुले-शाहू- आंबेडकर ते आताचे (उदा.) मेधा पाटकर वा अण्णा हजारे यांच्यापर्यंत या सनातन व्यवस्थांचे नवे ज्ञानशास्त्र व नीतिशास्त्र मांडण्याचा प्रयत्न चालू आहे. सीता आणि द्रौपदीने काही प्रश्न उपस्थित केले; त्यांचे वर्णन आज आपण 'स्त्री-मुक्तीवादी प्रश्न' असे करतो. आज वर्ण- जाती-लिंगभेदातील अनैतिकता उघड झाली आणि दलित अध्ययनशास्त्र या नव्या घटनेचा उदय झाला. भारतीय प्रबोधनाचे फलित म्हणजे हे सारे नवे ज्ञान, असे संक्षेपात म्हणता येते. पण आजच्या भारताचे चित्र पाहता 'भारतीय प्रबोधनाचे नीतिशास्त्र रचले गेले आहे काय ? ते यशस्वी होत आहे काय ?' असे ज्ञानशास्त्रीय प्रश्न उपस्थित होऊ शकतात. 
      लोकशाही राज्यव्यवस्थेतील कोणतीही निवडणूक ही या साऱ्या व्यवस्थांचे नवे ज्ञानशास्त्र रचू पाहते आणि नव्या कल्याणकारी नीतिशास्त्राची अपेक्षा करते. लोकशाहीत राज्यकर्त्यांचे नीतिशास्त्र जनतेशी बांधील राहिले नाही, ते निव्वळ आत्मकेंद्री झाले की जनता ते राज्य उलथवून टाकते, नव्या राज्यकर्त्यांचा प्रयोग करते. हे नेहमीच घडते. हे लोकशाहीचे तर्कशास्त्र असते. 
      आता अगदी खासगी गोष्ट घ्या. रस्त्यावर चालावे कसे ? हा प्रश्न नतिक असतो. का ? याचे कारण तो नागरिकशास्त्राचा प्रश्न असतो तर 'मयत होणे' ही घटना 'मृत्यू म्हणजे काय ?' हा तात्त्विक प्रश्न निर्माण करतो. पुढे, माझ्या घरात मृत्यूची घटना घडणे आणि दुसऱ्याच्या घरात घडणे व त्याच वेळी माझे मनरंजन मी करू पाहाणे हे सामाजिक नतिकतेचे प्रश्न बनतात. हेच प्रेम व युद्ध या दोन घटनांबाबत कसे घडते, ते पाहा. 
          प्रेमात व युद्धात सर्व काही माफ असते, याचा अर्थ प्रेम आणि युद्ध हे ज्ञान आणि नीती यांच्या पलीकडे असतात का ? असा नवा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. प्रेम ही ज्ञानाची गोष्ट नसून करण्याची गोष्ट आहे, असे एक उत्तर दिले जाते. ते निश्चित नसते. कारण प्रेम विकृत झाले की हिंसा घडते. िहदी सिनेमा या विकृतीचे दर्शन घडवितो. प्रेम जितकी मुलभूत नैतिक गोष्ट असते तितकीच युद्ध ही मुळातच अनैतिक घटना असते. याचे उघड कारण युद्ध समाजाचा नाश करते. म्हणजे युद्धाचे नीतिशास्त्र ही महत्त्वाची बाब बनते. मग ते युद्ध रस्त्यावरचे भांडण असो, प्रेमयुद्ध असो वा सीमायुद्ध असो, महायुद्ध, ती अनैतिकच बाब बनते. म्हणूनच प्रेम म्हणजे काय ? हा तात्त्विक प्रश्न काव्य, साहित्य किंवा नाटकाचा प्रश्न बनवून 'प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते' असे अत्यंत खासगी व अतार्किक उत्तर न देता गंभीर तात्त्विक उत्तर दिले पाहिजे. कारण पुढे, देशप्रेम ही आणखी गंभीर बाब असते. 
         या आणि अशा साऱ्या संकल्पना नीटपणे समजावून घ्यावयाच्या असतील समाजात काहीएक निश्चित तात्त्विक दृष्टिकोन निर्माण होणे, हीच ज्ञानशास्त्रीय गरज असते. तात्त्विक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी प्रत्येकाला तात्त्विक प्रशिक्षणाची गरज असते. आल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेड (१८६१-१९४७) हा ब्रिटिश तत्त्ववेत्ता म्हणतो, 'समाजातील सार्वजनिक शिक्षणव्यवस्था जोपर्यंत जनतेत तात्त्विक दृष्टिकोन निर्माण करू शकत नाही तोपर्यंत अस्सल लोकशाही समाज निर्माण होऊ शकत नाही. तत्त्वज्ञान म्हणजे निव्वळ उदात्त भावनांचा एकगठ्ठा कल्लोळ नसतो. कोणत्याही भावनिक प्रक्षोभात चांगले काही होण्यापेक्षा नुकसानच अधिक होते. तत्त्वज्ञान असे कधीही नसते. तत्त्वज्ञान हे नेहमी मानवी प्रतिभेचे एकाचवेळी समीक्षात्मक आणि परिशीलन करणारे, आशयघन व सामान्य स्वरूपाचे - सर्वाना उपयोगात आणता येईल असे साधन - असते. तत्त्वज्ञानात वस्तुस्थिती, सिद्धान्त, पर्याय आणि आदर्श यांना एकाच पारडय़ात समान रीतीने तोलले जाते. शक्यता आणि त्यांची वस्तुस्थितीशी केलेली तुलना यांचे ते निरपेक्ष सर्वेक्षण असते.' (अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ आयडियाज, १९३३ ) 
         आता, विद्यमान भारतीय शिक्षणव्यवस्था असा तात्त्विक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये विकसित करते की निर्घृण आणि विकृत आíथक दृष्टिकोन निर्माण करते, हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. कारण 'अज्ञान नव्हे, तर अज्ञानाचे अज्ञान हाच ज्ञानाचा मृत्यू असतो', असे अन्य एका ठिकाणी व्हाइटहेड म्हणतात.